सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य (Mumbai Kabutarkhana) टाकण्यावर महानगरपालिकेने याआधीच निर्बंध घातले आहेत. तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत. या सवयीमुळे मुंबईकरांना आरोग्याचा धोका निर्माण होत असून सार्वजनिक ठिकाणी घाण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे आता महापालिका विशेष मोहीम राबवणार आहे.
दादरमधील प्रसिद्ध कबूतरखान्यावर बीएमसीने अचानक कारवाईचा बडगा उगारला. सकाळपासूनच पालिकेचे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि कबुतरांसाठी साठवून ठेवलेले सर्व धान्य, दाणे, वरण्याचे पोते गाड्यांमध्ये भरून नेले. अचानक घडलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण कबुतरे झुंडीने आकाशात उडत गेली, आणि अनेकांनी हा नजारा पाहण्यासाठी गर्दी केली.
Mumbai Kabutarkhana पालिकेच्या कारवाईचे समर्थन
काही स्थानिकांनी पालिकेच्या कारवाईला समर्थन दिले. त्यांचं म्हणणं होतं की, “कबूतरखान्यामुळे त्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. रस्त्यावर थांबलेली माणसं, खाद्य घेऊन येणारे लोक, कबूतरांची गर्दी हे सगळं वाहतुकीसाठी मोठा अडथळा होता.” दुसरीकडे, काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. “कबूतरांना अन्न घालणं ही आपली परंपरा आहे. हे केवळ धर्मभावना नव्हे, तर माणुसकीचे लक्षण आहे,” असं एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
मनपाने आता शहरभर कबुतरांना खाद्य देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष जनजागृती व दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. फ्लेक्स व पोस्टर्सद्वारे जनजागृती, विशेषतः कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनविकार, क्लॅमिडायोसिस यांसारख्या आजारांबद्दल जागृती केली जात आहे. तसेच कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही निरीक्षण करण्यात येणार आहे.
दादरमधील ही कारवाई केवळ सुरुवात असल्याचे संकेत आहेत. पुढील काळात शहरातील इतर ठिकाणांवरही अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी यामध्ये सहकार्य करून शहराच्या आरोग्य आणि वाहतुकीच्या व्यवस्थेस हातभार लावणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.