पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम बाळगावा, असे आवाहन हवाईदलाने (Indian Air Force) केले आहे. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचे हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आतापर्यंत या ऑपरेशनमध्ये हवाई दलाने थेटपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण पहिल्यांदाच याबाबतची घोषणा झाल्यामुळे मोठी कारवाई असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ती नेमकी कारवाई काय झाली, कोठे झाली, कशाप्रकारे झाली? याकडे आता भारतीयाचे लक्ष लागले आहे. युद्धविराम स्वीकारला असल्याची घोषणा करणाऱ्या आणि प्रत्यक्षात त्याचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला या कारवाईतून मोठा धक्का दिला गेला असल्याचेही स्पष्ट होत आहे.
भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. ऑपरेशन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत, जाणीवपूर्वक आणि सावधगिरीने पार पाडण्यात आले. ऑपरेशन्स अजूनही सुरूच आहे. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. सर्वांना खोटी माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन, भारतीय हवाई दलाने केलं आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMO यांचा उद्या संवाद होण्याच्या आधीच ही कारवाई झाली आहे. दरम्यान युद्धविराम, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्ताची भूमिका बजावण्याची तयारी, पाकिस्तानकडून युद्धविरामाचा भंग अशा साऱ्या बाबींवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सर्व वरिष्ठ सेना अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याआधी भारताने काल रात्रीच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते. त्यात सियालकोट हवाई तळाला मोठा तडाखा दिला होता.