भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. (India Pakistan War) पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील 26 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या भारतीय लष्कराने हा प्रयत्न उधळून तर लावलाच, त्याचबरोबर पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले केले. याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. भारताने देशातील तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली, त्यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे लष्कराने निकामी केली, असा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी केला आहे. (India fires missiles at three Pakistani air force bases)
पाकिस्तानने शुक्रवारी, सलग दुसऱ्या रात्री, जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. विमानतळ तसेच हवाई दलाच्या तळांसह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना पाकिस्तानने लक्ष्य केले होते, पण त्यांचे हे हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले, अशी माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. मात्र, रात्रीच्या अंधारात केलेल्या हल्ल्यात पंजाबमधील फिरोजपूर येथील एका कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले. पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये जखमी होण्याची ही एकमेव घटना आहे. ब्लॅकआउट सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.
मात्र, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन हवाई दलाच्या तळांवर हल्ले करण्यात आले. भारताने नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (झांग जिल्हा, पंजाब) या तीन पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली. परंतु, पाकिस्तानी हवाई दलाचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले. तर दुसरीकडे, देशाचे हवाई क्षेत्र पहाटे 3.15 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली.
भारताने आदमपूर शहरातून सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यापैकी एक क्षेपणास्त्र आदमपूरमध्येच पडले, तर उर्वरित अमृतसर भागात पडली. परंतु, यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या दिशेनेही काही भारतीय क्षेपणास्त्रे गेल्याचा दावाही त्यांनी केला.