पाकिस्तानचा (Pakistan) वाईट काळ पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने 7 मार्च रोजी पाकिस्तानचे मोठे नुकसान केलं.. पाकिस्तानवर आता बलुचांनीही (Baloch Liberation Army Attack On Pakistan) खोलवर घाव घातला आहे. बीएलएने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडीने हल्ला केला, ज्यामध्ये 12 सैनिक ठार झाले.
बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने (STOS) बोलानच्या माच कुंड भागात रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटाद्वारे त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाला लक्ष्य केले, ज्यामध्ये 12 सैनिकांचा मृत्यू झाला. सैनिक लष्करी कारवाईसाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील बलुचिस्तानमधील कच्छी जिल्ह्यातील माच भागात सुरक्षा दलाच्या वाहनावर आयईडीने हल्ला करण्यात आला. मंगळवारी हा हल्ला करण्यात आला. पण हल्ल्याचे फुटेज आता सोशल मीडियावर समोर आले आहे. फुटेजमध्ये असे दिसून आलंय की, स्फोटानंतर वाहनात बसलेले सैनिक हवेत अनेक मीटर उडाले. सैनिकांच्या चिंधड्या-चिंधड्या उडाल्या.
हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, बलुच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी माच परिसरात सुरक्षा दलाच्या वाहनाला स्फोटकांनी लक्ष्य केले. या हल्ल्यात त्यांचे सात सैनिक ठार झाल्याचे लष्कराने म्हटले होते. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांच्या सुरक्षा दलांनी 10 दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केलाय.
त बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले करत आहे. त्यांचे मोठे नुकसान करत आहे. मार्चमध्ये, क्वेट्टाहून पेशावरला जाफर एक्सप्रेसचे बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या सदस्यांनी अपहरण केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले गेले. स्थानिक बलुच लोक आणि पक्षांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून अशांतता आहे. गेल्या दोन दशकांपासून तिथे अशांतता आहे. सतत हल्ले होत आहेत. स्थानिक बलुच नेत्यांचा आरोप आहे की, देशाचे संघराज्य सरकार बलुचिस्तानच्या मौल्यवान खनिज संपत्तीचे शोषण करत आहे आणि त्यांना दुय्यम दर्जाचे राष्ट्र म्हणून वागवत आहे.