पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला (Operation Sindur ) करण्यात आला होता. यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा दिला आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना उत्तर दिले. त्यांच्या धैर्याला सलाम, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
‘ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेने केला. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. निष्पाप भारतीयांना न्याय देण्यासाठी सैन्याने केलेल्या या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो, असे काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. भारताविरुद्ध कोणताही दहशतवाद भारत सहन करणार नाही, हाच संदेश आज या कारवाईमधून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे, असं विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले आहेत.
याआधी देखील देशावर जेव्हा संकट आले, तेव्हा भारतीय सैन्याने कारवाई केली आहे. आज देखील दहशतवाद्या विरोधात केलेल्या कारवाईने दाखवून दिले की, भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती. आज भारतीय सैन्याने एक मोठा धडा पाकिस्तानला शिकवला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. दहशतवाद विरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला आमचा पाठिंबाच आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.