अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन मंगळवारी (11 जून) पुण्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “नुसती आंदोलने करून काही होत नाही, सत्तेत राहून लोकांची कामे करावी लागतात,” असे विधान केले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अजित पवारांचे ते विधान म्हणजे विरोधी पक्षाच्या स्थानाला छेद देणारे विधान आहे. आंदोलने केली नाहीत, तर सत्ताधारी माजतील,” असा शब्दात त्यांनी यावेळी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Shivsena UBT on Ajit Pawar NCP statement and Election)
शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार यांनी आंदोलनावर जी भूमिका मांडली, ती लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे जे स्थान आहे, त्याला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने आंदोलने जर केली नाहीत, तर सत्ताधारी माजतील. राज्य-देश लुटतील. महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील. जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही,” अशी टीका त्यांनी यावेळी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, शरद पवारांनी त्यांचा जो पक्ष उभा केला, ते आंदोलनातून उभा केला. शिवसेनेसारखा पक्ष हे एक आंदोलन आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले नसते. अशी अनेक आंदोलने आम्ही केली नसती, तर आज अजित पवार आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते,” असा टोला त्यांनी लगावला.
भाजपसह त्यांच्यासोबत असलेल्या सत्तेतील मित्रपक्षांवरही खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, “सत्तेत राहुन लोकांची कामे एकेकाळी करत येत होती. पण आजकाल सत्ता तिजोरी लुटायलाच वापरली जाते. यावर अजित पवारांइतके दुसरे कोणीही भाष्य करू शकणार नाही. गेल्या दहा वर्षांत भाजप आणि त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रांत असा एकही विभाग नाही की, जिथे लुटमार केली नाही. जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले, हे नरेंद्र मोदींना विचारा,” अशी टीका केली. “सत्तेत राहून ज्यांनी मागील काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली, त्यांच्या चौकशा सुरू झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत गेले. जनतेची सेवा करायला गेले, असे कोणी म्हणत असेल, तर ते ढोंग आहे. सत्तेत ते यासाठी गेले की, त्यांना स्वत:ची कातडी, स्वत: वरील कारवाया वाचवायच्या होत्या.” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.