भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 25 जागाही जिंकू शकत नाही. त्यांनी विधानसभा निवडणूक सेटिंग करुन जिंकली आहे. सहा महिन्यांत असे काय घडले की तुम्ही एकतर्फी विजयी झाले, असा रोखठोक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने सेटिंग केल्याचा आरोप केला. त्यानंतर पुन्हा एकाद राज्यात विधानसभा निवडणूक निकालाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी आम्ही (महाविकास आघाडी) लोकसभा जिंकल्यानंतर सहा महिन्यात असे काय घडले की तुम्ही एकतर्फी विजय मिळवला, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. लाडकी बहीण वगैरे ठिक आहे, पण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झालीच नाही, असा आमचा दावा आहे. राहुल गांधी यांनी पाच मुद्दे उपस्थित केले, त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार मोदींना दिला पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर थेट हल्लाबोल करत संजय राऊत म्हणाले, मोदी-शहांनी देशातील संवैधानिक संस्था हायजॅक केल्या आहेत. भाजपचे लोक म्हणत आहेत की राहुल गांधी खोटं बोलत आहेत. खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार नरेंद्र मोदींना दिला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते संवैधानिक पदावरील व्यक्ती आहेत. देशातील प्रमुख 14 वृत्तपत्रांनी राहुल गांधींचा लेख प्रकाशित केल्यामुळे भाजप उघडा नागडा पडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे बिथरले आहेत. त्यांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा. नवी गीता लिहिवी. तुम्ही महाराष्ट्रात कसे जिंकला हे आता जगाला कळाले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जेवढ्या जागा मिळाल्या ते तेवढ्या जागा जिंकूच शकत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut भाजपने सेटिंग करुन निवडणूक जिंकली
ते म्हणाले की, भाजपने ज्या पद्धतीने जागा वाटप केले त्यातून त्यांनी सेटिंग झाले आहे. भाजप महाराष्ट्रात 25 जागाही जिंकू शकत नाही. भाजपने विधानसभा निवडणूक हायजॅक केली. भाजप सेटिंग करुन निवडणुका जिंकतेय हे जगाला माहित झालं आहे. एकनाथ शिंदे यांना 10-15 आणि अजित पवार त्याच रेंजमध्ये असताना, त्यांना एकतर्फी विजय मिळाला. भाजपने जे जागा वाटप केले, ते निवडणूक आयोगाने केलेले जागा वाटप आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.