राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. या दोन्ही पक्षातील नेते याबाबत विविध मत व्यक्त करत आहेत. तर शुक्रवारी (ता. 6 जून) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश नाही तर बातमी देईन, असे म्हटल्याने भविष्यात मनसे-ठाकरे गट युती निश्चित आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या याच विधानावर शंका का असावी? असा प्रतिप्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. तर मनसे जुन्या गोष्टी उकरून काढत असल्याने आम्ही मागे वळून पाहात नाही, असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 7 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मूळ शिवसेनेचे ते सर्वेसर्वा आहेत. तुमच्या प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, ते होईल. मी संदेश नाही, बातमी देईन स्पष्ट उत्तर दिल्यावर तुमच्या मनात शंका का असावी? असा प्रतिप्रश्न राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही तो उपऱ्यांचा, शेठजींचा पक्ष आहे. आम्ही 106 हुतात्म्यांच्या बलिदानाशी बांधिलकी ठेऊन काम करणारे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्यावेळी महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक पक्ष आपल्या विचारधारा बाजूला ठेऊन एकत्र आले, तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला. मला वाटते भाजपाने महाराष्ट्रात तसे वातावरण निर्माण केले आहे. मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी आवाज उठवणारे सगळ्यांना एकत्र यावे लागेल, असे राऊतांनी म्हटले.
तर, मनसेचे काही नेते आजही 2014 आणि 2017 मध्ये त्यांनी युतीबाबत विचारणा केली होती. परंतु, तेव्हा शिवसेनेने प्रतिसाद दिला नाही, याबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे या संदर्भात संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा ते म्हणाले की, कोण काय म्हणत आहे, मागच्या गोष्टी खाजवत बसले आहेत, त्यात मला इंटरेस्ट नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचे आहे, तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्याकडे पाहत आहोत. 2014 साली काय झाले? 1857 च्या बंडात तुमचा विचार असा होता, किती मागे जाणार आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भविष्याकडे पाहा. आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना वर्तमान आणि भविष्य संपवण्याचे काम चालू आहे, असा आरोप राऊतांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम असल्याचेच पाहायला मिळत आहे.