मुंबई महापालिका मुख्यालयात पावसाळी (Mumbai Rain) कामांशी संबंधित सर्व अधिकारी चांगलेच कामाला लागल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. राज्याच्या मुख्य सचिव यांना माहिती अहवाल सादर करायचा असल्याने संबंधित अधिकारी मुंबईची तुंबई का झाली, याची कारणे शोधावयास लागल्याचे सांगण्यात आले. तसेच, आयुक्तांच्या बैठकीत देखील सदर कारणे सादर करावयाची असल्याने अधिकारी, कर्मचारी हे चांगलेच कामाला लागले होते. (Mumbai rain affected city monsoon works BMC officials)
मान्सून केरळ येथून मुंबईत येण्यास किमान सात दिवसांचा तरी कालावधी लागतो. मात्र, केरळमधून मान्सून गोवा मार्गे तळ कोकणात आणि तेथून मुंबईत झपाट्याने दाखल झाला. याची नीटपणे चाहूल हवामान खात्याला लागली नसावी. त्यामुळे त्यांनी रविवारी फक्त यलो अलर्ट दिला होता. त्यामुळे मुंबई महापालिका यंत्रणासुद्धा बेसावध राहिली. सोमवारी बसलेला जोरदार पाऊस हा कदाचित अवकाळी पाऊस असावा, असे हवामान खाते आणि महापालिकेला देखील वाटले होते. मात्र, हा पाऊस जून ऐवजी मे महिन्यात अखेरीस येऊन धडकला. त्यामुळे पालिका यंत्रणेची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे हवामान खात्याकडे सहा डॉप्लर रडार असताना त्यांना पावसाचा नेमका अंदाज कसा काय आला नाही? त्यांनी सतर्क राहून तत्काळ महापालिका आणि इतर यंत्रणेला सावध का केले नाही? त्यांच्याकडून निष्काळजीपणा झाला की काय? याबाबत पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.
मुंबईत सोमवारपर्यंत जेमतेम 71 टक्के एवढीच अर्धवट नालेसफाईची कामे झाली होती. तसेच, ठिकठिकाणी नाल्यातील गाळ काढून नाल्यालगत, रस्त्यालगत ठेवण्यात आला होता. पावसाच्या पाण्याबरोबर हा गाळ पुन्हा नाल्यात वाहत गेला. तर, काही ठिकाणी सदर गाळ रस्त्यावर वाहत पसरला. त्यामुळे अर्धवट नालेसफाई आणि त्याबाबत नसलेले गांभीर्य हे सुद्धा एक कारण ठरले आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप कार्यान्वित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. कारण की, मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते. त्यानुसार पालिकेने 25 मे रोजीपासून पंप लावण्यास प्रारंभ करण्याचे नियोजन केले होते. मात्र पंप लावण्यासाठी काही परवानग्या आवश्यक असतात. इंधनाची आवश्यकता, मनुष्यबळ आदी सर्व बाबी आवश्यक असतात. त्यामुळे सोमवारी जेव्हा ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले त्यावेळी त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप सुरू नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. सोमवारी ज्यावेळी सकाळपासून जोरदार पाऊस बरसला व पावसाचे पाणी साचले. त्यावेळी समुद्रात मोठी भरती होती. त्यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरू नये यासाठी फ्लड गेट बंद होते. परिणामी शहरात साचलेले पाणी समुद्रात सोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुंबईत सखल जास्त प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले.
मुंबईसह राज्यात आज असे असेल वातावरण
हवामान खात्याचा निष्काळजीपण पालिकेला नडला. महापालिका पावसाचा खराखुरा अंदाज घेण्यासाठी संपूर्णपणे हवामान खात्यावर अवलंबून असते. मात्र हवामान खात्यालाच अवकाळी पाऊस की मान्सून याबाबत खरा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे पालिका यंत्रणा काहीशी बेसावध राहिली. त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. रस्ते खोदल्याने आणि ते रस्ते काम अपूर्ण राहिल्याने पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यात मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचून राहिले. या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांचा बेसावधपणा कारणीभूत ठरला. रविवारी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला होता. मात्र, रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाचा जोर वाढल्यानंतर हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला. मात्र, पावसाचा जोर अधिक वाढल्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला. त्यानंतर महापालिका यंत्रणा खऱ्या अर्थाने कामाला लागली. मात्र, रेड अलर्ट जारी केल्यावर सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला.