मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस (Rain Update) बरसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे. अशातच आता आजही अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलायं.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसत असल्याची परिस्थिती आहे. कालही राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने आता पुढील तीन दिवसही पाऊस बरसणारच अशी दाट शक्यता आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात तीन दिवसांचा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं. तर मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यात आज 20 मेपासून कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार राज्यात धो-धो पाऊस बरसत आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलायं.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात हीच स्थिती राहणार असून कमाल तापमानात कोणतीही वाढ होणार नाही. तर किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.