भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी (ता. 10 मे) सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. पण या निर्णयाच्या अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानने पुन्हा भारतातील काही ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. पण शनिवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धबंदीच्या निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)आक्रमक झाले आहेत. या निर्णयामुळे भारताची बेअब्रू झाली असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. तर या युद्धबंदीच्या निर्णयात पाकिस्तानला मध्यस्थी करण्याचा काय अधिकार? असा प्रश्नही राऊतांनी उपस्थि केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 11 मे) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युद्धबंदीबाबत स्पष्ट मत व्यक्त करत म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी कोणत्या आधारावर केली? भारत 140 कोटी लोकांचे महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आपण शस्त्रविराम करतो. काय कारण आहे? यामुळे भारताला काय मिळाले? पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही ही भाषा पंतप्रधान मोदींनी केली होती. मग आता पाकिस्तानचे तुकडे करणार होते त्याचे काय झाले? भारताची बेअब्रू झाली आहे. मी पहिल्यापासूनच म्हटले आहे की, पाकिस्तान हा मूर्ख देश आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली आहे की आम्ही युद्ध जिंकलो. पण भारताच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही. त्यामुळे त्यांनी कोणत्या अटी शर्थींवर शस्त्रविराम दिला? हे सर्वपक्षीय बैठक घेऊन सांगितले पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
तर, पाकिस्तानला कायमची धडा शिकवण्याची हीच संधी होती. तरीही देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली आणि सैन्याचे तसेच देशाचे मनोबल उद्ध्वस्त केले. कोणासाठी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी. त्यांचा काय संबंध आहे आपल्या देशाशी? सार्वभौम राष्ट्राने हा निर्णय का घेतला? 26/11 हल्ला झाला तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी यूनोमध्ये गेले होते आणि सांगत होते की, ओबामा के पास जा कर रो रहै है… आता मोदी ट्रम्पकडे जाऊन रडताहेत का? खरे तर हा देशाच्या हुतात्म्यांचा, कुंकू पुसले गेलेल्या भगिनींच्या त्यागाचा अपमान आहे. या क्षणी माघार घ्यायची गरज नव्हती, असे राऊत म्हणाले.
तसेच, सिंदूर वगैरे सगळं राजकारण आहे. 26 पर्यटकांचा बळी गेला, त्यांचा अपमान मोदींनी केला आहे. हे युद्ध टोकाला जाऊन पोहोचले असताना अवसानघातकी निर्णय मोदींनी घेतला. कोणाच्या तरी दबावाला बळी पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला आहे. हल्ल्यांमध्ये नुकसान भारताचे झाले आहे. पाकिस्तानचे काही वाकडे झालेले नाही. पण हे युद्धबंदीच्या निर्णयात डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? जर त्यांची मध्यस्थी जगात मानली जाते तर मग इस्रायलचे युद्ध का थांबवले नाही? मोदींचे मित्र ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दिला नाही, असे यावेळी राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे आता खासदार संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेला भाजपा नेतेमंडळींकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.