राज्यात ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार पहिलीपासून पाचवीपर्यंत हिंदी शिकवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता मराठी, इंग्रजीसोबत हिंदीही तिसरी भाषा म्हणून शिकवावी लागणार आहे. तर इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशी तीन भाषा शिकवली जाणार आहेत.
या निर्णयावर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही (Hemant Dhome) ट्विटरवर पोस्ट करत हिंदी सक्तीला विरोध केला आहे. त्याने लिहिलंय की, भारत हे विविधतेने नटलेलं संघराज्य आहे, प्रत्येक राज्याने आपली भाषा आणि संस्कृती जपायला हवी. हिंदी व्यवहारासाठी चालेल, पण ती जबरदस्तीने शिकवायला लावू नका. मराठीतच पुढच्या पिढ्या वाढल्या पाहिजेत, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं. शेवटी त्याने #हिंदीसक्तीनकोच असा हॅशटॅगही वापरला.
सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षांनी आणि मराठी एकीकरण समितीनेही जोरदार विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती केली तर मुळासकट उखडून फेकू,” असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला. हिंदी पहिलीतून सक्तीने शिकवायची गरजच काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.