पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय, असं वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Modi) दिल्लीत ओबीसींच्या भागीदारी न्याय महासंमेलनात त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. UPA सरकार सत्तेत असताना जातनिहाय जनगणना न करणे ही मोठी चूक झाल्याची कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे.
मोदी म्हणजे काही मोठी समस्या नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही डोक्यावर बसलवयं. मीडियावाल्यांनी फुगा तयार केला. पूर्वी तर मी भेटलो नव्हतो. आता मी दोन-तीन वेळेस भेटलो. मला आता समजलं, त्यांच्यात काहीच नाही. सगळा शो आहे. काही दम नाही. तुम्ही त्यांना भेटले नाहीत, मी भेटलोय. त्यांच्यासोबत रूममध्ये बसलो. चर्चा केली, अशी जोरदार बॅटिंग राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली. त्याचवेळी काँग्रेसच्या काळातील चुकांवर बोट सुद्धा ठेवलं.
2004 मध्ये राजकारणात आलो. आता त्याला 21 वर्षे झाली. मी माझ्या राजकीय जीवनाचे आत्मपरिक्षण करतो. मी कुठे योग्य काम केलं आणि कुठं कमी पडलो, याचा धांडोळा घेतो. जमीन अधिकरण कायदा, मनरेगा कायदा आणि आदिवासी समाजासाठीचे विधेयक ही चांगली कामगिरी आहे. पण एका चुकीची मला कबुली द्यावी लागेल. मी ओबीसी वर्गाचं संरक्षण करण्यात कमी पडलो. मी ओबीसी वर्ग समजून घेतला असता तरी ही चूक झाली नसती.
UPA सरकार असतानाच मी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे होते. मी या मंचावरून सांगतो, ती माझी मोठी चूक होती. मी ती चूक सुधारणार आहे. ओबीसी समजाला मी सांगतो की, त्यावेळी मी ओबीसी समाजासाठी जे करायला हवे, ते त्यावेळी केले नाही. पण आता मी दुप्पटीने या वर्गासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता मागे हटणार नाही असंही ते म्हणाले आहेत.