झारखंडच्या दारू घोटाळ्यात (Jharkhand Liquor Scam) शिंदे गटाच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली, असा स्फोटक आरोप संजय राऊत यांनी केलाय.शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 25 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. राऊतांच्या मते, तब्बल 800 कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा महाराष्ट्रात झालाय. या प्रकरणात निविदेचे मूल्य 600 कोटींनी वाढवण्यात आले. या घोटाळ्याचे आर्थिक लाभ श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनकडे वळवण्यात आले, असा थेट आरोप राऊतांनी केला.
या प्रकरणात झारखंड एसीबीच्या पथकाने पुण्यातून अमित साळुंखे या व्यक्तीला अटक केली आहे. राजकीय वर्तुळात या अटकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत जात असल्याचे पुरावे आहेत.
Sanjay Raut अमित साळुंखे कोण आहे ?
अमित साळुंखे (Jharkhand Liquor Scam Amit Salunkhe) हा सुमित फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. महाराष्ट्रात या कंपनीला १०८क्रमांकाच्या अॅम्बुलन्स सेवा चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. याच कंपनीने झारखंडमध्येही सरकारी कंत्राटे घेतली होती, जिथे सध्या दारू घोटाळ्याचे प्रकरण गाजत आहे. झारखंडमधील अँटी करप्शन ब्युरोनं (ACB) साळुंखेला या घोटाळ्याच्या संदर्भात अटक केली आहे.
राऊतांच्या म्हणण्यानुसार, साळुंखे हे श्रीकांत शिंदेंच्या मेडिकल फाउंडेशनशी थेट संबंधित आहेत. या प्रकरणात मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
Sanjay Raut संजय राऊत म्हणाले काय?
राऊत म्हणाले की, झारखंड एसीबीने महाराष्ट्रात येऊन साळुंखेला अटक केली आहे. तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा भाग आहे. 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचा पैसा या फाउंडेशनमध्ये वळवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी पैसे गोळा करण्यात आले का, हे देखील तपासावे लागेल. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, मंत्रिमंडळाची झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे.
Sanjay Raut जितेंद्र आव्हाड यांचीही प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावरून या प्रकरणावर भाष्य केले. झारखंडमधील दारू घोटाळ्यात पुण्यातील ठेकेदार अमित साळुंखे याला अटक झाली आहे. तो सुमित फॅसिलिटी कंपनीचा प्रमुख असून, याच कंपनीला महाराष्ट्रात अॅम्बुलन्स सेवा देण्याचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीचा काम करण्याचा पद्धतशीर फॉर्म्युला म्हणजे – निविदा भरताना कमी दर दाखवायचे, काम मिळवल्यावर आर्थिक अपहार करायचा. झारखंडमध्येही याच पद्धतीनं काम करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. आतापर्यंत झारखंड प्रकरणात एकूण 11 जणांना अटक झाली आहे.
Sanjay Raut राजकीय भूकंपाची शक्यता?
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील नेत्यांवर थेट आर्थिक घोटाळ्याचे आरोप होणं. या आरोपांना अटक झालेल्या व्यक्तींच्या तपशीलांमुळे बळ मिळणे, ही राज्य सरकारसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. राज्याच्या रुग्णवाहिका सेवेतील निविदा प्रक्रियेपासून ते झारखंडमधील दारू घोटाळ्यापर्यंत सुमित फॅसिलिटीचा संदेहास्पद सहभाग स्पष्ट होत आहे. यामुळे यापुढे या प्रकरणात ईडी, सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.