अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला याच्याशी (Shubhanshu Shukla) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) खास संवाद साधला. या संवादातच पीएम मोदींनी शुक्लाला एक अनोखा होमवर्क दिला. आता आपल्याला गगनयान मिशन पुढं न्यायचं आहे. स्वतःचं स्पेस स्टेशन (Space Station)आपल्याला तयार करायचं आहे. चंद्रावर भारतीय अंतराळवीरांची सुरक्षित लँडिंग करायची आहे. तुमचा अनुभव या अभियानात उपयोगाला येईल असे पीएम मोदी शुभांशूला म्हणाले.
यावर शुभांशू शुक्लानेही खास उत्तर दिलं. या मिशनची ट्रेनिंग (Axiom Mission 4) घेताना मला जे काही शिकायला मिळालं ते मी आता आकलन करुन घेत आहे. मी ज्यावेळी माघारी येईल तो क्षण आपल्या देशासाठी निश्चितच महत्वाचा असेल. आपल्या अभियानात माझे अनुभव निश्चितच कामाला येतील त्यामुळे आपले मिशन लवकरात लवकर पूर्ण होतील असा विश्वास वाटतो.
एक्सपेरिमेंटच्या प्रश्नावर उत्तर देताना शुभांशू म्हणाला, भारतीय शास्त्रज्ञांनी सहा अगदी युनिक एक्सपेरिमेंट डिझाईन केले आहेत. त्यांना मी स्पेस स्टेशनवर घेऊन आलो आहे. माझा पहिला प्रयोग स्टेम सेल्ससाठी अतिशय चांगला आहे. खरंतर अंतराळात आल्यानंतर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती नसते. त्यामुळे स्नायूंना नुकसान होते. एखादे सप्लीमेंट देऊन स्नायूंचे नुकसान थांबवता येऊ शकते का किंवा ही प्रक्रिया लांबवू शकते का. याचे डायरेक्ट इंप्लिकेशन पृथ्वीशीही निगडीत आहे. ज्या लोकांना वृद्धापकाळात मसल लॉसची समस्या जाणवते त्यांच्यावर या सप्लीमेंटचा उपयोग केला जाऊ शकतो.
PM Modi अन्न सुरक्षा क्षेत्रात होणार फायदा
याबरोबरच दुसरा प्रयोग मायक्रोवेल ग्रोथवर आधारीत आहे. हे खूप लहान असतात पण त्यात न्यूट्रीशनचे प्रमाण जास्त असते. जर आपण अशी काही प्रक्रिया शोधून काढली आणि अत्यंत तणावाच्या परिस्थितीत पृथ्वीवर त्याचे उत्पादन घेता आले तर याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे पृथ्वीवर अन्न सुरक्षा क्षेत्रात मोठा फायदा होईल. अंतराळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संपूर्ण प्रोसेस येथे खूप कमी वेळात होते. त्यामुळे महिने किंवा वर्षांपर्यंत वाट पाहण्याची गरज राहत नाही, अशी माहिती शुभांशू शुक्लाने दिली.
मोदी पुढे म्हणाले, आपल्या गगनयान मिशनच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे असे मी आज विश्वासाने सांगू शकतो. तुमची ही अंतराळ यात्रा एक ऐतिहासिक यात्रा इतकीच मर्यादीत नाही तर विकसित भारताच्या यात्रेला अधिक वेग आणि बळकटी प्रदान करील. भारत आता जगासाठी अंतराळातील नव्या शक्यतांचे दारे उघडणार आहे. भारत फक्त झेप घेणार नाही तर भविष्यातील नवनवीन अभियानांसाठी एक व्यासपीठही तयार करणार आहे.