ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याचं बोललं जात आहे. हिंदी भाषा सक्तीविरोधात (Hindi Compulsary) राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केल्यानंतर आता संजय राऊतांनीही ट्विटद्वारे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. याबाबत संजय राऊतांनी ट्विट करत “महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे ब्रँड आहेत!” असं कॅप्शन देत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचवलीयं.
राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्ती या निर्णयाविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी विरोध केला असून राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे गट आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही रस्त्यावर उतरणार असल्याचं चित्र आहे. राज ठाकरे यांनी येत्या 5 जुलै रोजी हिंदी भाषा सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकारण ढवळून निघालंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार असल्याचं ट्विट ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलंय. संजय राऊत यांनी हे ट्विट केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना टॅग केलंय. अर्थात संजय राऊत यांनी ही बातमी दिल्लीलाही कळवल्याचं दिसून आलंय.
संजय राऊत यांनी या मुद्द्यावर आज सकाळी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलीयं. संजय राऊत बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी 5 जुलैच्या मोर्चाची घोषणा केली आहे. मराठी माणसाची अस्मिता आणि स्वाभिमानासाठी हा मोर्चा आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जसं आपण एत्रक आलो तसाच लढा उभं करण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाटत आहे. त्यामुळेच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मनाने एकत्र आलेले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.
तसेच सध्या मुंबईवर आक्रमण, मुंबई तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या समितीत राज्यातील सर्वच पक्ष एकत्र येऊन लढले होते. आत्ताही आम्हाला त्याप्रमाणेच लढावं लागणार आहे. त्यावेळी समितीचं नेतृत्व ठाकरेंनी केलं होतं. आत्ताही ठाकरेंनाच नेतृत्व करावं लागणार आहे. या मोर्चासाठी सर्वच पक्षांना आम्ही निमंत्रण देणार असून हा राजकीय लढा नाही तर मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा लढा असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय.
Sanjay Raut शरद पवारांची भूमिका काय?
महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाही. मातृभाषा महत्वाची आहे. दोन्ही ठाकरेंचं वक्तव्य ऐकलं. तिथं गेल्यावर मी त्यांचं म्हणणं काय आहे, ते समजून घेणार आहे. त्यांनी राजकीय कार्यक्रम जाहीर केले आहे. त्यात राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं म्हटलंय. जर सहभागी व्हायचं असेल तर यामागे त्यांचं नेमकं काय धोरण आहे, ते समजून घ्यावं लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलंय. कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा, तर सहभागी होता येणार नाही. आधी त्यांचा मुद्दा समजून घ्यावा लागेल, असं ते शरद पवार यांनी म्हटलंय. मला याच्यात वाद दिसत नाही, फक्त सरकारने पहिली ते चोथीपर्यंत हिंदीचा हट्ट करू नये, असंही ते म्हणाले आहेत.