मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला असून पावसाने (Maharashtra Rain)सर्वदूर हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून (Heavy Rain) काढले आहे. कालही राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यांचा वेग प्रचंड होता. त्यामुळे झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडले. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे दिसत आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि शनिवारी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना शनिवारी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
राज्यात जोरदार पाऊस होण्यामागे कारण आहे. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापासून ओडिशापर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड, मराठवाडा, कर्नाटकचा अंतर्गत भाग येथून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत चक्रीय वातस्थितीच्या वरच्या भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतातील पंजाब ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती दिसत आहे. राजस्थानचा आग्नेय भागापासून मध्यप्रदेशापर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. ही परिस्थिती येत्या 17 जूनपर्यंत कायम राहील अशी शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 15 जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारपासून पुढील 48 तासांत विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
आज कोल्हापूर, कोल्हापुरचा घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज रायगडला ऑरेंज तर शनिवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाड्याला पावसाने झोडपले
दरम्यान, बुधवारी राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. कालपासून छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह (Marathwada) मुसळधार पावसाने थैमान घातले. केळी व पपईच्या बागा आडव्या पडल्या, विजेचे १७ उपकेंद्रे आणि शेकडो वीजखांब कोसळले. शेतकरी उभ्या पिकांच्या नुकसानीने हताश, तर महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.