प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावरील बंदी हटवून (POP Ganesh Murti) मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मूर्तिकार आणि मूर्ती कारखानदारांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत २०२० च्या तुलनेत मवाळ भूमिका घेतल्याने उच्च न्यायालयाने बंदी हटवली आहे. मात्र, यातून आता नवा पेच निर्माण झाला आहे. गणेशमूर्तीची निर्मिती करण्यास परवानगी मिळाली असली तरी विसर्जन कसे करायचे, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
म्हणजे दात पडलेल्या माणसाला चणे खायला देण्यासारखा हा प्रकार आहे. अनेक वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे प्रदूषण होते आणि जलचरांसाठी पीओपी घातक आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीने पीओपीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
पीओपीवर बंदी ती मागणी उच्च न्यायालयाने मान्य करत घातली होती. या बंदी निर्णयामुळे गणेश मूर्तिकार आणि गणपती कारखानदारांची आर्थिक कोंडी झाली होती. पीओपी मोठ्या मूर्तींसाठी स्वस्त पडते, शिवाय शाडूच्या मातीपेक्षा पीओपीची मूर्ती वजनाला हलकी असते, तसेच शाडूच्या तुलनेत पीओपीच्या मूर्तींची वाहतूक करणे आधिक सोपे असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीओपी कुठेही उपलब्ध होते. शाडूच्या मातीचे तसे नाही. त्यामुळे मूर्तिकार आणि गणपती कारखानदारांनी पीओपी बंदीला कडाडून विरोध केला होता. अखेर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित माहिती उच्च न्यायालयाला दिली आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची निर्मिती तसेच विक्रीला विरोध नसल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र या मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करू नये, असेही स्पष्ट केले.
याबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आता निर्णयाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे. म्हणजे पीओपीची मूर्ती कारखानदार बनवू शकतात, त्या मूर्तीची विक्रीही करता येईल मात्र, या मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जन करता येणार नाही किंवा अशा मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे लागणार आहे. पीओपीच्या घरगुती मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे सहज शक्य आहे. शिवाय ठराविक उंचीच्या मूर्तींनाही कृत्रिम तलावांमध्ये सामावून घेता येणे शक्य आहे.
मात्र, १० ते १२ फुटांहून उंच मूर्तींचे करायचे काय, हा प्रश्न आहेच. हे म्हणजे गुटखा निर्मिती करा मात्र विकता येणार नाही किंवा बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या निर्मितीला परवानगी आहे मात्र, वापरावर बंदी आहे, असा प्रकार आहे. म्हणजेच कारखानदारांनी पीओपीची मूर्ती बनवायची, तिची विक्री करायची मात्र, मंडळांपुढे या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न कायम राहणार आहे. आता याबाबत ३० जूनपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करायची आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्त्व आणि मूर्तिकार, कारखानदारांची संख्या पाहता सरकार पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेण्याची शक्यता कमीच आहे. कारण सरकारला एवढ्या मोठ्या वर्गाला नाराज करणे शक्य होणार नाही. मात्र, पीओपी पर्यावरणाला घातक असेल तर समाज म्हणून आपल्याला आपल्यात काही बदल करण्याची कठोर भूमिका घ्यावी लागेल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उंचच उंच मूर्तीचा आग्रह न धरता घरगुती गणपतीपेक्षा थोडी उंच मूर्तीची स्थापना केली तर ते मोठे पाऊल ठरेल.
कारण लहान मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे शक्य होणार आहे. मात्र, गंभीर बाब म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर बंदी घातली होती. म्हणजेच पीओपी पर्यावरणाला मारक असल्याने त्यांनी मान्य केले होते. मग अचानक पीओपीची मूर्ती बनवण्यावर आणि विक्री करण्यास विरोध नसल्याची ‘सुधारित’ भूमिका घेण्याचे कारण काय?केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर यातून शंका उपस्थित होते आणि आता हा प्रश्न सरकारच्या कोर्टात गेल्याने त्याला राजकीय महत्त्व सामाजिक जाणीवेपेक्षा प्राप्त होणार आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे कृत्रिम तलावात पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न आहेच. कृत्रिम तलावात विसर्जन केलेल्या पोओपीच्या मूर्तींचे पुढे काय करणार, म्हणजे त्याची विल्हेवाट कशी लावणार, यावर समाधानकारक उत्तर नाही. यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशमूर्तीकारांकडे आता जेमतेम दोन महिने आहेत. शाडूच्या मूर्ती बनवणे, पावसाळी वातावरणात त्या सुकवणे आणि त्यावर रंगरंगोटी करण्याचे आव्हान या कालावधीत असणार आहे.
त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा मुद्दा धार्मिक न बनवता सामाजिक प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न म्हणूनच त्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कारण मोठे अर्थकारण गणेशोत्सव निव्वळ सण नसून त्याभोवती फिरत असते. म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, गणपती कारखानदार आणि सरकारने एकत्र येत सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. मंडळांनी महाकाय तसेच उंच मूर्तींचा आग्रह सोडला तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. मात्र, यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची!