25.5 C
New York

Uddhav Thackeray : …म्हणून मोदी अयोध्येत पुन्हा फिरकलेच नाहीत, ठाकरेंची बोचरी टीका

Published:

22 जानेवारी 2024च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येत आता राम दरबाराचे सगळ्यात मोठे आयोजन झाले. भव्य राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा राममंदिराच्या पहिल्या मजल्यावर झाली आहे. गुरुवारी हा धर्म सोहळा पार पडला. याचबरोबर रामजन्मभूमी परिसरात नव्याने उभारलेल्या आठ मंदिरांतही मूर्तींची स्थापना झाली. पण या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नाहीत. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मोदी पुन्हा अयोध्येत फिरकलेलेच नाहीत. कारण ज्या श्रीरामांच्या नावाने मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरले, त्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तर प्रदेशात श्रीरामांनी मोदी यांना रोखले, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब (Uddhav Thackeray) ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

गेल्यावर्षी 22 जानेवारी रोजी राममंदिरात श्रीरामांची प्रतिष्ठापना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी जगभरातून बड्या पाहुण्यांना भाजपाने आमंत्रित केले. राममंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा हा एक राष्ट्रीय सोहळा म्हणून आयोजित व्हायला हरकत नव्हती, पण भारतीय जनता पक्षाने याचे खासगी राजकीय सोहळ्यात रूपांतर करून पावित्र्य घालविले, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून सोडले आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला होता, पण मोदी यांनी लोकसभेतले बहुमत गमावले. भाजपा 240 वरच रखडला. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मोदी यांनी कसेबसे कुबड्यांवरचे सरकार बनवले. ते इतरांच्या मेहेरबानीवर चालले आहे. त्यामुळे मोदी हे श्रीरामांचे बोट पकडून त्यांना अयोध्येत घेऊन आले (असे त्यांचे भक्त सांगतात) त्या श्रीरामांनीच अयोध्येच्या पवित्र भूमीवर मोदी यांचे बोट सोडले आणि भाजपाची नाव शरयू नदीत हेलकावे खाऊ लागली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img