22.2 C
New York

Local Train : धावत्या लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू, दिवा-कोपरदरम्यान धक्कादायक घटना

Published:

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा (Local Train) प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काही प्रवासी यात जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलला लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृत्यू झालेले सहा जण कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवासी होते, असंही समजतंय. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे लोकल जात होती. या लोकलच्या दरवाजावर लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यांचा तोल गेला.

घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. त्याचप्रमाणे या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही, तर रुळाच्या बाजूला पडले, असं लीला यांनी सांगितलं आहे.

Local Train रेल्वे प्रशासनाने काय म्हटलंय?

“पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही. कसाऱ्याला जाणारी लोकल आणि पुष्पक एक्स्पेस बाजूनेच जात होत्या. त्यामुळे कोणत्या ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले, हे समजू शकलेलं नाही,” अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

धावत्या रेल्वेतून आणखी काही प्रवासी खाली पडल्याची माहिती मिळतेय. नेमकं काय घडलं होतं, याबाबती माहिती समोर आली नाही. दरम्यान जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हे प्रवासी 30-35 वयोगटातील असल्याचंही समजतंय. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

“ही घटना नेमकी कशी घडली, त्यामागचं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गाड्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न नेहमीच सरकारकडून केला जात आहे. परंतु प्रवाशांची, नागरिकांचीही जबाबदारी असते. हे कशामुळे झालं, हे समोर आल्यानंतर सविस्तर बोलता येईल”, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

भाजपचे आमदार संजय केळकर याप्रकरणी म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दु:खद आहे. हेच पाच प्रवासी नेमके कसे पडले, डब्यात खूप गर्दी होती का, हे तपासणं गरजेचं आहे. परंतु प्रवाशांना सुरक्षा, सुविधा आणि सेवा देण्याचं काम पूर्ण ताकदीने प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येतं. ही घटना का घडली, याची चौकशी झाली पाहिजे. यात प्रशासनाच्या काही त्रुटी असतील तर त्या दूर करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img