26 C
New York

ECI : मतदानाची टक्केवारी कळणार दर दोन तासांनी, बिहार निवडणुकीपासून नवी सिस्टीम लागू

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. हा निकाल अविश्वसनीय असल्याचे सांगत मतदानाच्या टक्केवारीतील घोळामुळे महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. बिहार निवडणुकीपासून पण आता असा प्रकार घडणार नाही, निवडणूक आयोगाने (ECI) याची काळजी घेतली आहे. मतदानाची आकडेवारी अपडेट करण्यात निवडणुकीच्या दिवशी होणाऱ्या विलंबावर उपाय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मॅन्युअल रिपोर्टिंग पद्धतीऐवजी तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे जनतेला मतदानाच्या टक्केवारीबद्दलची माहिती वेळेवर उपलब्ध होईल. (Voter turnout to be declared on time through new system from Bihar elections)

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनीही मतदानाची टक्केवारी वेळेत उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. या नव्या सिस्टीममुळे पूर्वीच्या मॅन्युअल रिपोर्टिंगच्या तुलनेत लागणारा वेळ कमी होईल. ही नवीन प्रणाली बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरू होईल. आता प्रत्येक मतदान केंद्राचे पीठासीन अधिकारी दर दोन तासांनी ECINET Appवर मतदानाच्या टक्केवारीची माहिती देतील. लगेचच ही माहिती मतदान संपल्यानंतर देखील दिली जाईल. ECINET App हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर व्होटर टर्नआउट (VTR) Appसह निवडणुकीशी संबंधित 40 App असतील. या Appद्वारे थेट माहिती पाठवली जाईल. निवडणूक आयोगाकडून यामुळे मतदान संपल्यापासून जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीदरम्यानचा कालावधी कमी होईल, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्यावेळी सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के, सकाळी 11 वाजपर्यंत 18.14 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान नोंदवले गेले. पण नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रात्री उशिरा 11.30 वाजताचे अपडेट्स म्हणून 65.02 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. तर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी 66.05 टक्के मतदान झाल्याचे सांगितले. शेवटच्या टप्प्यात जवळपास साडेसात टक्क्यांनी वाढलेल्या मतदानाचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी त्यावेळी काँग्रेसने केली होती, हे उल्लेखनीय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img