गेल्या काही महिन्यांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक करताना दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार संवादात चांगले नाहीत, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. (Devendra Fadnavis’ statement about Eknath Shinde and Ajit Pawar while praising Sharad Pawar is in the news)
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. कारण या वयातही ते जय-पराजयाची तमा न बाळगता सातत्याने काम करत राहतात. पण त्यांच्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांचे सातत्याने कौतुक करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी संवादात कोण चांगलं? असा प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्यांनी हलक्या-फुलक्या शैलीत असेही म्हटले की, माझ्या वक्तव्याबद्दल अर्थात ते दोघेही मला माफ करतील. एकनाथ शिंदे आणि अजित पवार संवादात चांगले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: म्हटल्यावर राजकीय वर्तुळात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.
Devendra Fadnavis महायुतीतील धुसफूस समोर!
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला 2019 पासून सातत्याने येत आहे. कारण कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत युती आणि आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे, असे बोलले जाते. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यापासून तिन्ही घटक पक्षातील धुसफूस अधूनमधून समोर येत असते. पालकमंत्रीपदाचा विषय असो किंवा विभागाला निधी मिळत असल्याचा आरोप असो. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील संवादाची त्रुटी बोलून दाखवल्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.