गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी (28 मे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते बाळा दराडे यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बदग्रस्त विधान केले. तर, गुरुवारी (29 मे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. (Sanjay Raut Shivsena UBT on NCP SP and Mahavikas Aaghadi young leaders)
मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते भाजपसोबत जाण्यास तयार आहेत,’ असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी, “सत्तेची तहान लागली असली तरी कोणी गटारातील पाणी प्यायचे नसते,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांना टोला लगावला. “तुम्ही प्रसारमाध्यमे सुप्रिया सुळे आणि अन्य काही नेत्यांची नावे घेत आहात. त्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातले किंवा गढूळ पाणी पीत नाही. त्यांना सगळ्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. परंतु, नेमक्या कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची म्हटले तरी लाटांचा सामना करावा लागणार आहे. महासागरात इतक्या मोठ्या लाटा उसळल्या आहेत, तिथे बरीच गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले स्थान शोधावे लागेल. तिकडे आधी गेलेले लोक आपल्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत. त्यात आता नवीन लोक तिथे जाऊन काय करणार?” असे म्हणत टीका केली.
देवेंद्र फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील नेते हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे ज्ञान आहे, त्यानुसार शरद पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत. शरद पवारांनी राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग खेळली आहे आणि अजूनही ते खेळत आहेत. आता ते प्रत्यक्ष मैदानावर नसले तरी ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. मी त्यांना ओळखतो, त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहीत आहे. ते आता 85 वर्षांचे असून पण अशा नेत्यांना काम करताना वयाचे बंधन नसते. त्यामुळे आत्तापर्यंत शरद पवार यांची जी भूमिका, विचारधारा होती ते पाहिल्यानंतर ते भारतीय जनता पक्षासोबत किंवा अशा विचारांच्या लोकांसोबत ते कधीच जाणार नाहीत, असा मला ठाव विश्वास आहे,” असे ते म्हणाले.