पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पहाटेच्या दरम्यान, पुणे पोलिसांनी एका खेडेगावातून अटक केलीयं. मागील सात दिवसांपासून हे दोघेही बापलेक फरार होते. अखेर शुक्रवारी पहाटे त्यांना अटक केलीयं. पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली. संपूर्ण शरीरावर गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवीच्या जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील 23 वर्षीय वैष्णवी हगवणेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचे सुरुवातीला समोर आले होते. पण त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप करुन तिची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही अटक केली आहे. आता फरार सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर यांना सात दिवसांनंतर बेड्या घातल्या आहेत. गेले सात दिवस फरार असलेल्या राजेंद्र आणि सुशील हगवणे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. राजेंद्र हगवणे हे तळेगावमधील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी (22 मे) कैद झाले होते. ही माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना समजताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पण या घटनेची अधिकृत माहिती अजूनही पोलिसांनी दिली नाही. यासंदर्भात पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले. वैष्णवीने आत्महत्या केली का? की, तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झालेत. या घटनेप्रकरणी वैष्णवीची सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील सात दिवसांपासून फरार होते. या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक तपास करीत होतं. अखेर आज पहाटेच्या सुमारास एका छोट्याशा खेडेगावातून दोघांना अटक करण्यात आलीयं.राज्य महिला आयोगाकडून या घटनेत पहिल्याच दिवशी सुमोटो दाखल करण्यात आला होता. कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासन त्यांचे काम उत्तमरित्या करत आहे. गुन्हा नोंद आहे,आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर दिली.