आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा इशारा दिला आहे.
मुंबईसह (mumbai) ठाणे (thane), पालघर (palghar), नाशिक (nashik) आणि रायगड (raigad) जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून ५०-६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अनुभव आला असून अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. नागोठणे (naigothne), रोहा (roha), पाली (pali) परिसरात जोरदार वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कल्याण-डोंबिवली (kalyan – dombivali) परिसरात झाड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याण पूर्वेकडील रचना पार्कमध्ये एक झाड कोसळले तर चिंचपाडा रोडवर कोसळलेल्या झाडामुळे दोन वृद्ध रिक्षात अडकले होते. त्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दहिसर पूर्वेतील एस. व्ही. रोडवर झाड कोसळल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.