पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक (Air strike) करत चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) २१ दहशतवादी छावण्यांवर आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी छावण्यांवर एअर स्ट्राईक करत हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, यानंतर सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती वेगाने बदलत आहे. हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर, गृह मंत्रालयाने आता एक मोठे पाऊल उचललं. बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफसह सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व सैनिकांनी दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे आणि सीमावर्ती भागात जास्तीत जास्त उपस्थिती राखावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेत.
यासोबतच शाह यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधत सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलण्यासंदर्भात आदेश दिलेत.
तसेच जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो आणि संवेदनशील आस्थापनांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.
Operation Sindoor पंतप्रधान मोदींचा ‘या’ देशांचा दौरा रद्द…
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान मोदींनी एक मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींचा नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्स या तीन देशांचा दौरा सध्यासाठी रद्द करण्यात आला. मोदी या ३ युरोपीय देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय चर्चा आणि बैठकांमध्ये सहभागी होणार होते. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा रद्द करण्याचं कारण सांगण्यात आलेलं नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा काळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मानलं जातंय.
Operation Sindoor ७ राज्यांमधील विमान वाहतूक बंद
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर भारताने ७ राज्यांमधील ११ विमानतळांवरील विमान वाहतूक बंद केली आहे. श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, बिकानेर, जोधपूर, राजकोट, धर्मशाला, अमृतसर, भुज आणि जामनगरमध्ये उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. हे विमानतळ पाकिस्तान सीमेला लागून आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. देशातील अनेक महत्त्वाच्या संस्था आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.