महसूल विभागानं केलेली आयआरएस अधिकारी (Sameer Wankhede) समीर वानखेडे यांची बदली केंद्रीय प्रशासकीय लवादानं रद्दबातल ठरवली आहे. याप्रकरणी लवादानं या बदलीमागील विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन ताशेरे ओढले आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्य़न खान याच्या ड्रग्ज प्रकरणामुळं वानखेडे चर्चेत आले होते.
Sameer Wankhede लवादानं नेमकं काय म्हटलंय?
लवादाच्या प्रमुख पीठानं याबाबत निकाल देताना म्हटलं की, महसूल विभागानं २०२२ मध्ये समीर वानखेडेंची बदलीची ऑर्डर काढताना आपल्याच बदलीविषयक धोरणांची पायमल्ली केली आहे. तसंच या बदलीच्या कारवाईतून अर्जदाराविषयी सरकारचा दुजाभाव प्रतित होतो, असंही लवादानं म्हटलं आहे.
मे २०१० मध्ये सहायक आयुक्त म्हणून महसूल सेवेत रुजू झाल्यापासून ते ८ जून २०२२ पर्यंत मुंबईत कार्यरत होते आणि त्यांनी कधीही मुंबईबाहेर काम केलं नाही, असा दावा करून महसूल विभाग आणि थेट करांसाठी केंद्रीय मंडळानं त्यांची याचिका लढवली. त्यांनी पुढे निदर्शनास आणून दिलं की, विभागाच्या नियुक्ती समितीनं त्यांचे निवेदन विचारात घेतले आणि बदलीचा आदेश रद्द करण्यास नकार दिला कारण त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी आणि तपास प्रलंबित आहेत आणि त्यांना चेन्नईमध्ये तीन वर्षे पूर्ण व्हायची आहेत.
Sameer Wankhede कॅटच्या न्यायमूर्तींचं म्हणणं काय?
तथापि, चेअरमन, न्यायमूर्ती रणजित मोरे आणि सदस्य राजिंदर कश्यप यांचा समावेश असलेल्या CAT खंडपीठाने नमूद केलं की, महसूल विभागानं वानखेडे यांची मुंबईत नियुक्ती केल्याचा दावा केलेल्या दहा वर्षांच्या कालावधीपैकी, त्यांनी चार वर्षे दिल्लीत घालवली होती. “म्हणून, प्रतिवादींचा युक्तिवाद चुकीचा आहे आणि त्यावर अवलंबून राहता येणार नाही,” असं खंडपीठानं म्हटलं आहे. “प्रतिवादी त्यांच्याकडं अर्जदाराच्या पोस्टिंगची संपूर्ण माहिती असूनही असे खटले लढवत आहेत, हे निराशाजनक आहे. या भूमिकेमुळं अर्जदाराप्रती त्यांचा पक्षपात दिसून येतो”
वानखेडे यांना देण्यात आलेला बदलीचा आदेश विभागाच्या 2018च्या बदली मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे, ज्या अंतर्गत प्रतिवादींनी त्यांचे प्रशासकीय कामकाज न्याय्य आणि न्याय्य पद्धतीनं चालवणं आवश्यक आहे, असंही खंडपीठानं आपला निर्णय देताना म्हटलं आहे. त्यानुसार, 20 फेब्रुवारी रोजी बदली आदेश रद्द करताना विभाग “स्वतःचं धोरण कायम ठेवण्यात अयशस्वी ठरलं”, अशा शब्दांत ताशेरेही ओढले.
2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडे यांची २०२१ मध्ये मुंबईत नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या विभागीय संचालकपदी नियुक्ती झाली होती. या कार्यकाळात त्यांनी जेव्हा आर्यन खानला अटक केली त्यानंतर उद्भवलेल्या मोठ्या वादामुळं राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्यामुळं सरकारनं त्यांना पुन्हा त्यांचं होम केडर असलेल्या महसूल सेवा विभागात बदली केली होती. त्यानंतर त्यांनी ४ जानेवारी २०२२ रोजी त्यांची मुंबईत डायरेक्टरेट जनरल ऑफ ॲनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंटचे (DGARM) अतिरिक्त संचालक म्हणून पदभार स्विकारला. त्यानंतर 30 मे 2022 रोजी त्यांची बदली चेन्नई येथील करदाता सेवा महासंचालनालय (DGTS) इथं करण्यात आली.
Sameer Wankhede कुटुंबियांना धमकी
दरम्यान, जून 2023 मध्ये, वानखेडे यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अंडरवर्ल्डकडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांसह विविध वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळं बदली रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन महसूल विभागाकडं सादर केलं होतं. त्यांच्या निवेदनाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी अखेर कॅटशी संपर्क साधला होता. वानखेडेंनी जानेवारी 2024 मध्ये त्यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमक्या मिळाल्या असून वर्षभरातील वार्षिक सर्वसाधारण बदल्यांमध्ये आपल्या केसचा विचार करण्यात यावा. मात्र, त्यांची बदली रद्द करण्याच्या विनंतीकडं पुन्हा दुर्लक्ष करण्यात आलं.