मुंबई / रमेश औताडे
आदिवासी जमातिचा जल जंगल जमीन चा परंपरागत (Adivasi Andolan) अधिकारांचा प्रश्न सुटलेला नाही. रोजगाराचा अभाव असल्याने स्थलांतर पाचवीलाच पुजलेले आहे. सरकारी योजना, सवलती, राखीव जागा, शिक्षण यांची अंमलबजावणी धिम्या गतीने चालू आहे. त्यातच शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने आदिवासी जमाती धनगर जातीची घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जारण तारण कारण पूजा विधी महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागामध्ये सुरू करण्यात येईल असा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदिवासी नेते करणसिंग कोकणी, रंजीत गावित, विक्रा गावित यांनी दिला.
घटस्थापना हा आदीमातेचा उत्सव आहे. सर्व भगत पुजारी उपाशीपोटी पूजा विधीला बसलेले आहेत. आणि याच पूजा विधीच्या शेवटी ते या घट उठवण्याच्या दिवशी आवाहन करणार आहेत. आप, वायू, तेज, इत्यादी पंचमहाभूतांना आदिवासी हितासाठी जागवून त्यांना आवाहन करण्यात येणार आहे. दसऱ्यापासून गावोगाव पूजा विधी मंत्राच्या जागरातूनही शिंदे फडणवीस पवार सरकारची दुर्बुद्धी दूर झाली नाही तर मंत्राचा दुसरा टप्पा वापरावा लागेल असा इशारा दिला आहे.
मराठ्यांच्या विरोधामध्ये यांचे पुढारी स्वतःला ओबीसी म्हणून घेतात आणि ते आंदोलन संपले की दुसऱ्या दिवशी आदिवासींच्या सवलतीत आम्हाला जागा द्या म्हणून आंदोलन करतात. हे नेमके कोणत्या जातीचे आहेत हे ठरवण्याचे अधिकार यांनी स्वतःलाच घेतलेले आहेत. या देशांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आहे की नाही असा प्रश्न पडला आहे असे रंजीत गावित, विक्रा गावित यावेळी म्हणाले.