मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास, सध्याचे सरकार उलथून टाकू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी सोमवारी दिला. दरम्यान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जरांगेंच्या उपोषणावर वक्तव्य केलंय.
Prakash Ambedkar सरकारमध्ये कोण आहे?
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका करत मराठा समाजातील गरीबांना उद्देशून स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Hunger Strike), तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण सरकारमध्ये कोण आहे? आजच्या सत्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण आणि नारायण राणे असे प्रस्थापित मराठा नेते आहेत. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीतही शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांसारखे मराठा नेतेच सत्तेत होते.
आंबेडकर यांनी पुढे असा आरोप केला की, जरांगे पाटील आंदोलन गरीब मराठ्यांच्या नावाने करतात, पण निवडणुकीत मात्र त्याच श्रीमंत आणि सत्ताधारी मराठा नेत्यांच्या प्रचारात उतरतात. गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्यांना पाठिंबा देऊन, त्याच गरीबांना मूर्ख बनवू नका, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा त्याच भूमिका घेऊन गरीब मराठ्यांची फसवणूक करणार का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना केलाय.
दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या घोषणेमुळे 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मराठा आंदोलनाकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनातून सरकारवर किती दबाव येईल आणि आंबेडकरांच्या टीकेला जरांगे काय उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.