काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना (Balasaheb Thorat) किर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांनी नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिली. आज (21 ऑगस्ट) संगमनेरमध्ये याच्या निषेधार्थ विराट मोर्चा निघाला. या मोर्चातून थोरातांनी जनतेसमोर स्पष्ट सांगितले की, धमकीला मी घाबरणार नाही, तत्त्वांसाठी मरण्यासही तयार आहे. उमेदवार होण्याआधी कधी भगवी टोपी घातली होती का? हे नाटक कशासाठी. आम्ही अंत:करणातून हिंदू आहोत. पण आम्ही कोणाचा द्वेष करत नाही, असा टोला देखील थोरातांनी आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांना लगावला आहे.
Balasaheb Thorat स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे, विचारासाठी उभा राहणार
मोर्चादरम्यान थोरात म्हणाले , मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. माझ्यासाठी तत्त्वं, विचार हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मला मृत्यूला सामोरं जावं लागलं तरी मी तयार आहे. मी गांधीजी होऊ शकत नाही, हे मला माहीत आहे; पण तत्त्वांवर ठाम राहण्यासाठी मी मरणार असलो तरी हरकत नाही. विरोट मोर्चामध्ये बाळासाहेब थोरात यांनी संग्राम भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम दाखवला.
Balasaheb Thorat राज्यातील गोंधळावर टोला
थोरातांनी पुढे राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. आज संपूर्ण महाराष्ट्र गोंधळलेला आहे. बीडमधील घटना सर्वांना आठवतेय. विधानसभेत मारामाऱ्या होतात, मंत्र्यांकडे नोटांचे बंडल सापडतात. ही प्रकरणं झाकण्यासाठी कोकाटेंचा बळी देण्यात आला. यामागचं सत्य लोकांसमोर आलंच पाहिजे. तसेच एका विद्यमान आमदारावरही त्यांनी निशाणा साधला. तो आमदार माझा डीएनए तपासा असं म्हणतो. म्हणजे थेट माझ्या आईवर बोलतो. अशा प्रकारची भाषा आधी धांदरफळ येथे ऐकली होती. आता आमदारही तशीच भाषा बोलतो, ही निंदनीय बाब आहे, असा थेट आरोप थोरातांनी केला.
Balasaheb Thorat गुंडांचा बंदोबस्त आवश्यक
पोलिस आणि स्थानिक प्रशासनावरही थोरातांनी पुढे रोखठोक टीका केली. पोलीस घरगडी असल्यासारखे वागत आहेत. गुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आता परिस्थिती अशी आली आहे की ‘अमृतसेना’ उभी करावी लागेल,” असे ते म्हणाले. त्यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केले की, फक्त दुसरीकडे गोंधळ सुरू आहे, आपल्याला काही होणार नाही असं समजू नका. आज जे विष पेरलं जातंय ते ओळखा. आपणच सावध राहिलं पाहिजे
Balasaheb Thorat आरोप–प्रत्यारोप
थोरात म्हणाले की, आरोप आमच्यावर केला जातो की आम्ही लोकांना पाठवलं. पण घुलेवाडीतील लोक हे कीर्तनासाठी जातात, कारण वारकरी परंपरा मजबूत आहे. त्यामुळे खोट्या केससुद्धा लावल्या जात आहेत. तसेच त्यांनी एका महिला युट्यूबरवरही निशाणा साधला. एक बाई युट्यूबवर शिव्या देते. प्रश्न असा आहे की तिला कोण पैसे पुरवतं? अशी थेट विचारणा त्यांनी केली.