महायुती सरकारमध्ये सारेच काही आलबेल नाही. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही मिटलेला नाही. या मुद्द्यावर महायुतीत धुसफूस आहेत. अंतर्गत वादही खदखदत आहे. कधीकधी हा वाद बाहेरही पडतो. आताही स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरुन हा वाद बाहेर पडलाच. महायुतीतील या सुंदोपसुंदीवर विरोधकांकडून खोचक टोलेबाजी होतच असते. परंतु, आता सत्तेतील लोकही दबक्या आवाजात का होईना यावर बोलू लागले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनीही पालकमंत्रिपदाच्या या वादावर बोट ठेवले. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही पालकमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे व भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. नुकतेच स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना मिळाला. यामुळे मंत्री भरत गोगावले कमालीचे नाराज झाले. त्यांनी माध्यमांसमोर ही नाराजी व्यक्त सुद्धा केली होती. याबाबत पत्रकारांनी मंत्री विखे पाटील यांना विचारले.
मंत्री विखे म्हणाले, यावर बोलण्याचा किंवा भाष्य करण्याचा माझा अधिकार नाही मात्र एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून थोडीशी नाराजी सातत्याने व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कबूतरखान्यावरून मनसे आक्रमक झाली आहे यावर मंत्री विखेंनी भाष्य केले. आंदोलन करण्यापेक्षा काही सकारात्मक भूमिका घ्या. नुसत्या आंदोलन करण्यापेक्षा काही शाळा दत्तक घ्या काही गरीब मुलांना दत्तक घ्या केवळ प्रश्नांचे राजकारण करायचं. मांसाहार बंद करा व यावर देखील राजकारण केले जात आहे. मात्र हा काही राज्याचा प्रश्न नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलेली आहे अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मनसेचा समाचार घेतला.
Radhakrishna Vikhe राऊतांनी आधी आत्मपरिक्षण करावे
2019 साली तुम्ही महाराष्ट्रात सत्ता आणली मात्र ते भाजपाच्या विश्वासावर ते सरकार आलं होतं. मात्र भाजप पक्षाच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही सत्तेवर आलात म्हणून तुम्हाला जास्त दिवस सत्तेत राहता आलं नाही. त्यामुळे कोणावरही आरोप करण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा असा खोचक टोला मंत्री विखे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला.
Radhakrishna Vikhe मनोज जरंगे मुंबईच्या दिशेने
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्यांनी लवकरच मुंबईला येण्याचा इशारा दिला आहे यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले, आंदोलन करणे हा आंदोलनकर्त्यांचा अधिकार असतो. त्याद्वारे आंदोलक आपल्या मागण्या पदरात पाडून घेतात. मराठा समाजासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत ही त्यांची भूमिका चुकीची नाही.