22.6 C
New York

Raj Thackeray : कारवाई तर झालीच पाहिजे, कबुतर खान्यांबाबत राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

Published:

मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात जात मुंबईतील अनेक भागामध्ये कबुतरांना खायला घालणे सुरूच ठेवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध दादर कबुतर खान्यासोबतच मुंबईतील अन्य काही कबुतर खाने बंद करण्यात आले आहेत. पण मुंबईत ते सुद्धा दादर येथे कबुतर खान्यासंदर्भात वाद पेटलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या प्रकरणावर कोणतीच भूमिका घेतली नव्हती. मात्र, आता ठाकरेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे राज ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

कबुतर खाना बंदी प्रकरणावर शांत असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी गुरुवारी (ता. 14 ऑगस्ट) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कबुतर खाना बंदीवरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की, कबुतर खाना बंदी प्रकरणात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्यामुळे मला असे वाटते की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. त्यामुळे जैन मुनींनी सुद्धा याबाबत विचार करणे गरजेचे आहे. जर न्यायालयाने बंदी घातली आहे, तर ती गोष्ट केली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात, हे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना खायला घालू नये, असे न्यायालयाने सांगितलेले असताना त्यांना खायला घालण्यात येत असेल तर, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, असे ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यावर बंदी घातलेली असताना सुद्धा जर धर्माच्या नावाखाली त्यांना खायला घालण्यात येत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण या गोष्टींसाठी एकाने सुरुवात केली की, बाकीचे सुद्धा तसंच वागायला सुरुवात करणार. त्यानंतर मग उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यायचे कशाला? त्यामुळे काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे, असे यावेळी राज ठाकरेंनी म्हटले.

Raj Thackeray लोढा एका समाजाचे मंत्री नाही…

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही खडेबोल सुनावले आहेत. ते याबाबत म्हणाले की, या प्रकरणावरून जी आंदोलन होत आहेत, त्यामध्ये सुरुवातीला जैन लोकांनी आंदोलन केली. मग मराठी लोकांनी आंदोलन केली. ज्यावेळी त्या लोकांनी आंदोलन केले, तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. जी कारवाई झाली नाही. पण हे सर्व लोढांसारखी माणसे आहेत, जी मधे येत आहेत. ते खरं तर मंत्री आहेत, ते कोणत्या समाजाचे मंत्री नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा मान राखला पाहिजे. ज्या लोकांनी सुऱ्या आणल्या होत्या, पोलिसांनी त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. जी मराठी लोक बुधवारी आंदोलनासाठी गेली होती. त्यांची धरपकड करण्यात आली. पत्रकारांना सुद्धा मारले, त्यामुळे हा नेमका काय प्रकार सुरू आहे, हे अजून कळलेले नाही, सरकारला नेमके काय हवे आहे? हे सुद्धा कळलेले नाही. कारण पहिलं हिंदी आणून पाहिले, तेव्हा त्यांचे काही झाले नाही. आता हे कबुतर आणली आहेत. त्यामुळे आता माहीत नाही, पुढे आता यापुढे कोणत प्राणी येतील, असा हल्लाबोलच यावेळी राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img