कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत प्रशासनाने स्वातंत्रदिनादिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी मांसाहार बंदीचा आदेश काढला असतानाच मांसविक्रीचा (Meat Shop Ban Row) निर्णय आता मालेगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणीही घेण्यात आला आहे. विरोधक त्यामुळे आक्रमक झाले असून ते टीका करताना दिसत आहेत. तर, भाजपने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत कत्तलखाने बंदीचा निर्णय आजचा नसून 1988 सालापासून हा निर्णय अंमलात आला असल्याची आठवण विरोधकांना करून दिली आहे. याबाबत त्यांनी काही फोटोदेखील ट्वीट केले आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “काय खावे? काय खाऊ नये? याचा निर्णय सरकारने करूच नये, याबद्दल दुमत नाहीच. फक्त विविधतेत एकता असणाऱ्या आपल्या देशातील विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे, अशी भूमिका भाजपची आहे. 15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड हे 15 ॲागस्ट कत्तलखाना बंदीसाठी शरद पवारांचा निषेध करणार का? विरोध करणार का? त्यांना जाब विचारणार का? हा खरा प्रश्न आहे.” असा सवाल त्यांनी विचारात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
“15 ॲागस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारने घेतलेला नाही. 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि कॅाग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय आहे. शरद पवार त्यानंतर महिनाभरातच मुख्यमंत्री झाल्यापासून हा 15 ॲागस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला. एवढेच काय महाविकास आघाडी सरकारमध्ये 2 ते 3 वर्षांपूर्वी हे दोघेही मंत्री असतानासुध्दा 15 ॲागस्टला कत्तलखाने बंद ठेवण्यात आले होते, तेव्हा त्या विरोधात एक शब्दही हे दोघेही बोलले नाहीत.” असे म्हणत प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
“जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांना विस्मरणाचा आजार जडला असे म्हणणार नाही. कारण पक्ष आणि सत्ता गेल्याने सारासार विवेक गमावून नैराश्यात असलेल्या आव्हाड तसेच ठाकरेंकडून अर्थात सरकारच्या प्रत्येक कृती विरोधात बोलण्याशिवाय वेगळी अपेक्षाच जनता करत नाही. महायुती सरकारने सूर्य पूर्वेला उगवतो असे म्हटले तरी हे लोक त्याला विरोध करतील.” असे म्हणत केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. “प्रशासनावर उत्तम पकड असणाऱ्या तसेच महायुतीत उपमुख्यमंत्री असणाऱ्या आणि आता मांसबंदीच्या 15 ॲागस्टच्या निर्णयाला महायुती सरकारमध्ये विरोध नोंदवणाऱ्या अजित पवार यांनाही हा निर्णय झालाच नाही, याची माहिती असणारच याबद्दल शंका नाही.” असे म्हणत त्यांनी अजित पवारांनाही टोमणा लगावला आहे.