राज्य सरकारला सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryavanshi Case) मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेली अपील सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाच्या आदेशांना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितनुसार, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करणं योग्य ठरवलं आहे. तसेच या प्रकरणात आम्ही जे जे डॉक्टर सहभागी होते त्यांना देखील आम्ही आरोपी करणार आहोत. असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर दुसरीकडे या प्रकरणात हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न होता असं न्यायालयाच्या निदर्शनास आम्ही आणून दिला असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
4 जुलैला रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. खंडपीठाच्या या आदेशाला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
प्रकरण काय?
बंदची हाक परभणीत 11 डिसेंबर 2024 रोजी देण्यात आली होती. बंददरम्यान काही भागांमध्ये जाळपोळ आणि दगडफेकही झाली. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. सोमनाथ सूर्यवंशी यांनाही त्याच वेळी अटक करण्यात आली. अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत असतानाच सोमनाथचा मृत्यू झाला. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर दाखल करण्यात यावा, तसेच आंबेडकरी संघटनांकडून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.