राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबत निर्णय मागे घेतल्याने आज राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वरळी डोम (Worli Dome) येथे एकत्र विजयी मेळावा घेणार आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या मेळाव्यानंतर देखील ठाकरे बंधू एकत्र राहणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत या मेळाव्यातून मोठी घोषणा होणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यता येत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युतीचे संकेत मिळाले आहे.
माध्यामांशी बोलताना अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, आजचा दिवस आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी मनाची एकजूट घडवली त्याचसाठी आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हिंदी सक्तीच्या निर्णयाचा निषेध करुन तो मागे घेण्यात आला आणि त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मराठी जनतेने आजच्या मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. असं माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले.
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या सारखाच आजचा दिवस शिवसैनिकांसाठी मोठा सण आहे. ठाकरे बंधूंच्या एका सादेला मराठी जनतेने जो प्रतिसाद दिला तो मराठी मनाच्या एकतेचा विजय असून आता आम्ही एक-एक पाऊल पुढे टाकत आहोत. असं माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गटात युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.