हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यभरात वादळ उठले आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला आता विरोध करण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथून 5 जुलैला भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये मविआतील सर्व नेते आणि मनसे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. पण या मोर्चामुळे राज्यातील जनतेने पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत. पण ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून आता सत्ताधारी नेतेमंडळींनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे सूचक विधान केले आहे. (Sanjay Raut suggestive statement about Thackeray brothers coming together)मुंबई पर्यटन
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 29 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून होत असलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा याबाबत खासदार राऊत म्हणाले की, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात आता काही डोमकावळे कावकाव करत आहेत, पण त्यांचा संबंधच नाही आणि जर या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू. हिंदी सक्तीचा विरोध ही महाराष्ट्राची भूमिका आहे. साडे अकरा कोटी मराठी जनतेने एका आवाजात सांगितलेले आहे की, आम्हाला ही सक्ती मान्य नाही आणि मराठी जनतेची ही लोकभावना आहे, ही बाब सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांच स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावे लागते, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
तसेच, या क्षणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे यातच सगळं आलं आहे. याला बिटवीन द लाई्स म्हणतात, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम संवाद, सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही, असे सूचक विधान संजय राऊतांनी केले आहे. त्यामुळे या आंदोलनामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात, असे सांगण्याचा तर प्रयत्न राऊतांनी केलेला नाही ना, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
तर, ही फक्त दोन ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी नाही, असे मी म्हणत नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकीकरणाची नांदी आहे. या महाराष्ट्रात मराठी संघटन जे बाळासाहेब ठाकरे यांनी उभे केले, जगातला मराठी माणूस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक केला, त्याला तडे देण्याचे काम नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस वगैरे लोकांनी केले. तो मराठी माणूस उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने एक होणार असेल तर त्याचे स्वागत मराठी माध्यमांनीही करायलाच हवे, असे संजय राऊत म्हणाले.