महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा (Rain Alert) जोर असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे वाहणार आहेत. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी २६ ते ३० जून दरम्यान मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी २७ ते ३० जून धोक्याचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असणार आहे.
महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईमध्ये हलक्या सरी तर रायगडसह कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किनारपट्टी भागात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकणातील घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्ये अधिक जाणवणार असून दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम उपनगर, दादर, सायन, चेंबूर, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कोकणातील महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर यांसारख्या ठिकाणी जोरदार पावसामुळे सखल भाग जलमय होऊ शकतात. स्थानिक प्रशासनाने NDRF आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिला. तसेच, घाटमाथ्याच्या मार्गावर म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि कोकण रेल्वे मार्गांवर वाहतूक धीमी होण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात इतर भागात म्हणजेच पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खासकरून विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तर, काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडत आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, काही भागांत अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे वाहणार आहेत.