गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात विमानातील २४२ प्रवासी, क्रू मेंबर्स आणि काही स्थानिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे देशात हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रपरिषदेत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी विचारले की, “या अपघातामागे सायबर हल्ल्याचा संभाव्य हात असू शकतो का?” आणि “दोन्ही इंजिन एकाच वेळी बंद पडणे हे सहज शक्य आहे का?” या त्यांच्या प्रश्नांमुळे चर्चेला उधाण आले आहे.
राऊत यांनी ड्रीमलायनर विमानांच्या खरेदीबाबतही आठवण करून दिली. UPA सरकारच्या काळात ही विमाने खरेदी करण्यात आली होती, आणि त्यावेळी भाजपने त्याविरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते. विशेषतः इंजिन आणि तांत्रिक क्षमतेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल होते, ज्यांनी वारंवार खुलासे केले.
या अपघाताची तपासणी देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय एजन्सीज करत आहेत. ब्रिटन, पोर्तुगाल, तसेच बोईंग कंपनीचे अमेरिकी प्रतिनिधी सध्या तपासात सहभागी झाले आहेत. त्यामुळे राऊत यांनी स्पष्ट केले की, “आपण तज्ज्ञ नाही, आणि तपास सुरु असताना कोणतेही ठोस विधान करणे योग्य ठरणार नाही.”
तरीसुद्धा त्यांनी आपल्या मनातील शंका स्पष्ट करताना सायबर हल्ल्याची शक्यता नाकारली नाही. लष्कराच्या यंत्रणांवर देखील असे सायबर हल्ले होण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यांनी सूचित केले की, शत्रूराष्ट्रांकडून सायबर युद्ध नव्याने उभे राहत असून त्याचा धोका वाढतो आहे. राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अदानी समूहावर टीका करत अहमदाबाद विमानतळाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की, “सध्या विमानतळ कोणाच्या ताब्यात आहे? देखभाल कोण करतं? सुरक्षेची जबाबदारी कुणाकडे आहे?” आणि “येथे मनुष्यबळ अर्धवट आहे” असेही त्यांनी म्हटले. जर वेळेत या अपघाताबाबत लोकांच्या शंकांचं निरसन झालं नाही, तर भविष्यात नागरिकांचा हवाई प्रवासावरचा विश्वास डळमळू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.