राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. (Maharashtra Politics) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. वांद्र्यातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला. या दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अचानक ठरलेल्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला आपला विस्तार आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करता येते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुकी महत्त्वाच्या आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिका ही आहे, हे एकमेव कारण नाहीय, उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची यंदाची निवडणूक एकप्रकारे लढाई आहे. उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळत आहेत. वरिष्ठ स्तरावर मनसे आणि उद्धव ठाकरे गटात काय बोलणी झालीय? ते माहित नाहीय. पण खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांच मनोमिलन सुरु झालं आहे. दोन्ही पक्षांनी सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत एकत्र येणं ही गरज बनली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट त्या दोघांच्याही नियोजनात नसताना झालेली आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये आता ठाकरे बंधूंच्या युतीचा एंस होतो की येत्या निवडणुकांमध्ये आणखी वेगळी काही राजकीय समीकरण जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून महायुतीसाठी काही चांगलं होणार असेल तर या भेटीचे आम्ही स्वागत करतो. ठाकरे मनसेला घेत युतीसोबत आले तर आम्हाला आनंद आहे. दुसरा मुद्दा कोण एकत्र येण्याचा तर राज ठाकरेंचा स्वतंत्र विचार असून ते स्वाभिमानी आहेत. त्यांना समोरच्याने काय अट घातली की शिंदे, फडणवीसांना भेटता कामा नये, अशा अटी टाकून युती होईल आणि राज ठाकरे या अटींसमोर झुकतील हे शक्य नाही हे माझं वैयक्तिक मत असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.