मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना (Local Train Accident) घडली. यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. त्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अपघातानंतर सरकारवर टीका तर केलीच पण पुन्हा एकदा परप्रांतियांच्या मुद्द्याला हात घातला आहे.
Raj Thackeray काय म्हणाले राज ठाकरे?
आज जो अपघात झाला ते दुर्दैव आहे. पण मुंबईच्या रेल्वे मध्ये रोजच अपघात होत आहेत. असा एकही दिवस जात नाही की ज्यामध्ये अपघात होत नाही कोणाचा हात जातो कोणाचा पाय जातो. मग प्रश्न असा आहे की रेल्वे चालती कसे हा जगाला एक प्रश्नच आहे. मुंबईतल्या लोकांनी केंद्र सरकारकडे अनेकदा मागणी केली की, या करता एक महामंडळ करा. मुंबईच हे रेल्वे मंडळच वेगळं करा अजूनही या गोष्टींकरता काहीच होत नाही.
आता हा फक्त रेल्वे पुरता मर्यादित विषय नाही. यानिमित्ताने आपल्या शहरांचं काय झालं याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या सगळ्या शहरांचा विचका झालेला आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाहीत फक्त उंच उंच इमारती उभा राहत आहेत. रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये जर कुठे आग लागली. तर फायरचा बंब सुद्धा जाऊ शकत नाही. अशी आपल्या सगळ्या शहरांची अवस्था झालेली आहे.
टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच आपल्याकडे नाही. मी अनेक वर्षांपासून सांगतोय बाहेरून येणारे जे लोंढे आपल्या शहरावर आदळत आहेत याच बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच आपली रेल्वे कोलमडली. रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाही वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय काहीच माहित नाही.फक्त मेट्रो आणि मोनोरेल यांनी प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईमध्ये या सगळ्या सुविधा आहेत मग गाड्यांच रजिस्ट्रेशन थांबलं का?
मग या मेट्रो मोनोरेल कोण वापरत आहे कोण येतंय कोणीच पाहायला तयार नाही. सगळेजण निवडणुका प्रचार यांच्यातच गुंतलेले आहेत.शहर म्हणून कोणी बोलायला तयार नाही आणि शहराबद्दल काही बोललं तर तुमच्या चैनल वर त्याला किंमत नाही.गेले अनेक दिवस राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या बातम्या जेवढ्या काळ लावल्या तेवढ्या काळ हे जे मृत्यू झाले आहेत तुम्ही बातम्या लावणार आहात का?
आपण कशाला महत्त्व द्यायचं हेच समजेनास झालय.केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे. मी ही कॉलेजला असताना दोन वर्ष हार्बरने प्रवास करायचो त्यामुळे मला माहित आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि प्लॅटफॉर्मवर काय गर्दी असते. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा कशाला द्यावा तिकडे जाऊन सगळी परिस्थिती पहावी तिकडे काय चाललंय ते सुधाराव. आपल्या देशात माणसांची किंमतच नाही ही गोष्ट जर जगात दुसरीकडे घडले असते तर ते कसे पाहतात या सगळ्या गोष्टींकडे आपले सगळे मंत्री संत्री परदेशात जातात जग बघून येतात ते नक्की काय घेऊन येतात तिकडची रेल्वे आणू नका पण निदान विचार तरी घेऊन या असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.