राज्यात महायुतीचं सरकार स्थानापन्न होऊन सहा महिने उलटून गेले असले तरी सरकारमधील धुसफूस काही संपत नाही. सरकारमधील मंत्री आणि नेते वेळोवेळी असंतोषाला वाट करुन देत असतात. आताही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या (Girish Mahajan) वक्तव्याने महायुतीत अस्वस्थता वाढणार हे निश्चित मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्याने बरं झालं. मागचा अडीच वर्षांचा काळ खूप वाईट होता, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
जळगावात भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाजनांनी शिंदेसेनेला जोरदार टोला लगावला. महाजन पुढे म्हणाले, सध्या भाजपकडे सर्वाधिक पंचायत समित्या आहेत. ग्रामपंचायतींचे सरपंचही भाजपाचेच जास्त आहेत. आता आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजेत. जिल्हा परिषदेतही भाजपचे सदस्य असले पाहिजेत. जळगाव आणि नाशिक महानगरपालिकांत भाजपने उच्चांक गाठला पाहिजे.
यानंतर महाजनांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. कुणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. त्या भानगडीत आपण पडायचं नाही. आता जे बडबड करत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे याची माहिती तु्म्हालाही आहे. ज्यांना कुणीच विचारत नाही असेच लोक प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलत असतात. आपल्याला बोललं म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळते, असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांना लगावला.