मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. (Rain Update) सोमवारी (26 मे) पहाटेपासून मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागला. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक यामुळे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात बारामतीला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाने बारामतीसह दौंड आणि इंदापूरला झोडपल्याचे पाहायला मिळाले. तसेच, गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, गेल्या 35 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस संपूर्ण राज्यात मे 2025 मध्ये पडला असून राज्यातील 1990 नंतरचा हा सर्वात मोठा पाऊस ठरला आहे. (Rain Update in Maharashtra heavy rains in many districts)
Rain Update अशी आहे राज्यात परिस्थिती
रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्याला पावसाने झोडपले असून जोरदार पावसामुळे तालुक्यातील वाळवटी गावात पाणीच पाणी झाल्याचे समोर आले. श्रीवर्धनमध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रस्त्यावर तुंबलेल्या पाण्याचा प्रवाह थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, मुसळधार पावसाचा दापोलीलाही फटका बसला आहे. दापोलीमधील करजगाव मधील रस्ता खचला. तर कात्रण पावनाळ रस्ता पुलाचे काम अर्धवट राहिल्याने पाण्याखाली गेला आहे. अनेक भागात झाडांची पडझड झाली असून दापोलीसह गुहागर, चिपळूण, खेडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पंढरपूरमध्ये जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या पाण्याची पातळी दोन मीटरने वाढली आहे. तसेच, कराड पाटण तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. कराडमधील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो वाहत असून आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी मध्यम स्वरूपाच्या पडणारे पावसाने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहे.