पुणे पोलिसांनी 23 वर्षीय वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे या दोघांनाही शुक्रवारी (23 मे) पहाटे अटक केली. यानंतर आता महाराष्ट्रातून हगवणे कुटुंबाला कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हगवणे कुटुंबावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही माध्यमांसमोर केली आहे. तसेच, यावेळी एका प्रश्नांवर त्यांचा पार चढल्याचेही दिसून आले. (Ajit Pawar DCM on Rajendra Hagawane and Sushil Hagawane arrested in Pune)
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या व्हायरल व्हिडीओबद्दल विचारण्यात आले. मालेगावमधील एका सभेत अजित पवार यांनी ‘आता मी कोणत्याच लग्नाला जाणार नाही,’ असे म्हणत हास्यविनोद रंगला होता. पण, गंभीर बाब असताना अशा प्रकारच्या व्हिडीओने अजित पवारांवर टीका करण्यात येत होती. यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, “मी भाषणात म्हणालो होतो की, माध्यमांमधील लोकं मी लग्नाला गेल्याचे फोटो दाखवत होते. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो, आणि फोटो काढला. त्यानंतर काही वेगळे घडले त्यात माझा काय दोष?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “मी तिथे लोकांना असे म्हंटले की, जर माझ्यावर असे आरोप करण्यात येत असतील तर मी कोणाच्या लग्नाला जाणारच नाही. असे म्हटल्यानंतर समोरची लोकं हसली, त्यात माझा काय दोष? जर माझा दोष नाही तर मला का दोषी ठरवता?” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “कस्पटे कुटुंबाला विचारले का? अजित पवार कोणत्या विचारांचे आहेत? वैष्णवीचे वडील माझ्याशी बोलले आहेत. तुम्हाला काय अजित पवारांशिवाय उद्योग नाही. माझा कुठेही संबध नसताना माझे नाव जोडले जाते, मी अशाप्रकारचे कृत्य करायला सांगितले होते का?” असा सवाल करत त्यांनी माध्यमांबाबत संताप व्यक्त केला. “दुर्दैवाने विविध माध्यमांमध्ये काही जणांनी माझ्या नावाची बदनामी केली आहे, माझा त्यात दुरान्वयेही संबंध नाही. पहिल्या दिवसापासून कडक कारवाई करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. अटक झालेल्या दोघांनावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.