भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) लष्करी कारवाईत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. आता खास (India Pakistan Conflict) रणनिती तयार करून पाकिस्तानला जगात उघडं पाडण्याचा प्लॅन भारत सरकारने केला आहे. मोदी सरकारच्या या प्लॅनमध्ये फक्त भाजपाचेच खासदार नाहीत तर आणखीही काही विरोधी पक्षांचे खासदार यात आहेत. आता हे खासदार विविध देशांत जाऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा फाडण्याचं काम करणार आहेत. या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे.
तसं पाहिलं तर थरुर आणि ओवैसी मोदी सरकारचे कट्टर विरोधी ओळखले जातात. तरीही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) त्यांना या खास मोहिमेवक पाठवत आहेत. पण का? मोदी सरकारचा पाकिस्तानला उघडं पाडण्याचा नेमका प्लॅन काय सोप्या भाषेत समजून घेऊ या.
Operation Sindoor शशी थरूर यांचीच निवड का
पंतप्रधान नरेंद्र मोदी धक्का देणारे निर्णय घेण्यात माहीर आहेत. विरोधी पक्ष ज्याचा कधी विचारही करू शकत नाहीत असे निर्णय घेऊन सगळ्यांनाच चकीत करुन टाकण्याची मोदींची खासियत आहे. याआधी पीएम मोदींनी असे अनेक निर्णय घेतले आहेत. शशी थरूर यांना प्रतिनिधीमंडळात सहभागी करून घेण्याचा निर्णयही असाच आहे.
शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दीर्घ काळ काम केलं आहे. थरूर कुटनितीचे जाणकार आहेत. अशात जागतिक पातळीवर पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडण्यात थरूर मोठी भूमिका बजावू शकतात. तसं पाहिलं तर थरूर यांना संयुक्त राष्ट्रसंघात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. सन 1978 मध्ये यूएनएचसीआरमध्ये त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. 1981 ते 1984 पर्यंत सिंगापूरमध्ये थरूर यूएनएचसीआर कार्यालयाचे प्रमुख होते.
सन 1989 मध्ये त्यांना राजकीय प्रकरणांसाठी अवर महासचिवांचे विशेष सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यात युगोस्लावियात शांतता मोहिमेचाही समावेश होता. 2001 मध्ये त्यांना संचार आणि सूचना विभागाचे अंतरिम प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. यानंतर 2002 मध्ये त्यांना अवर सचिव म्हणून नियु्क्ती मिळाली. थरूर 2006 मध्ये कोफी अन्नान यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिव पदाच्या शर्यतीत होते. परंतु, त्यांना ही संधी मिळाली नाही. यावेळी थरूर दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
Operation Sindoor शशी थरूर कुटनितीचे मास्टर
थरूर कुटनितीचे जाणकार आहेत. कोणत्या देशाच काय स्वभाव आहे. या देशाला उत्तर कसं द्यायचं याची त्यांना चांगली जाण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला त्यावेळी थरूर यांनी मोदींच्या मौनाचं समर्थन केलं होतं. थरूर यांनी पीएम मोदींच्या त्यावेळच्या मौनाला कुटनितीचा भाग म्हटलं होतं. याआधी रशिया युक्रेन युद्धात मोदी सरकारच्या कुटनितीचंही थरूर यांनी समर्थन केलं होतं.
Operation Sindoor ओवैसींनाच का निवडलं
“मी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला आता कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून पुन्हा दुसरे पहलगाम होणार नाही. पाकिस्तानच्या आतंकी स्ट्रक्चरचा समूळ नाश झाला पाहिजे.”
ऑपरेशन सिंदूरनंतर एमआयएम प्रमुख असदुद्दीने ओवैसींचा मूड पूर्ण बदलला आहे. ऑपरेशन सिंदूर आधी ओवैसी पाकिस्तानला इतक्या कठोर शब्दांत फटकारतील याची कुणालाही कल्पना नसेल. परंतु, त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांनी याची प्रचिती दिली आहे. त्यामुळे प्रतिनिधीमंडळात ओवैसींची निवड करून सरकारने कोणतंही आश्चर्याचं काम केलेलं नाही.
Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरबाबतीत ओवैसींचं समर्थन
टिव्ही चॅनेल्सच्या डिबेटमध्येही त्यांनी सरकारच्या या कारवाईचं समर्थन केलं. अनेक वेळा तर त्यांनी पाकिस्तानी प्रवक्त्यांवर तुफान हल्लाबोल केल्याचेही दिसले. पाकिस्तानला त्याच्या कृत्यांची कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे ओवैसी म्हणाले होते. एक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओवैसी म्हणाले होते की देश माझ्यासाठी सर्वात आधी आहे.
Operation Sindoor मुस्लीम चेहरा, राजकारणी अन् वकीलही..
प्रतिनिधीमंडळातील कोणता सदस्य कोणत्या देशात जाणार याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, मुस्लीम असल्याने ओवैसी यांना कदाचित मुस्लीम देशांत धाडले जाऊ शकते. जागतिक पातळीवर ओवैसी मुस्लीम देशांसमोर ज्यावेळी भारताची बाजू मांडतील त्यावेळी त्यांच्या वक्तव्यात वजन राहील. ओवैसी एक राजकारणी तर आहेतच शिवाय ते एख चांगले वकील देखील आहेत. त्यामुळे ओवैसी त्यांचं म्हणणं नेहमीच त्यांची बाजू तर्काच्या आधारे मांडताना दिसतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला काउंटर करणं सहजासहजी शक्य होत नाही. अशा वेळी ओवैसी भारताची बाजू आधिक प्रभावीपणे मांडू शकतात.