भारतीय हवाई दलाने एका अत्यंत गोपनीय आणि निर्णायक कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील अंदाजे 9 दहशतवादी तळांवर रात्री दीड वाजता हवाई हल्ले केले. या कारवाईला “ऑपरेशन सिंदूर” (operation sindoor) असे नाव देण्यात आले आहे. या कारवाईनंतर देशात विविध ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
शाळा व महाविद्यालये बंद:
या कारवाईनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्ये शाळा व महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील तीन जिल्हे आणि जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये आज बंद राहतील. पंजाबमधील (punjab) फाजिल्का (fazilka), पठाणकोट (pathankot) , अमृतसर (amrutsar) आणि फिरोझपूर या सीमावर्ती जिल्ह्यांतील शाळाही बुधवारी बंद राहणार आहेत. पठाणकोटमधील सर्व शाळा पुढील 72 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. काश्मीर विद्यापीठाने 7 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील हवाई प्रवास बहुतांश ठिकाणी सुरक्षित असून प्रवाशांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र काही संवेदनशील शहरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून काही उड्डाणे तात्पुरती रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने 7 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जम्मू (jammu), श्रीनगर (shrinagar), लेह (loha), जोधपूर (jodhpur), अमृतसर, भुज (bhuj), जामनगर (jamnagar), चंदीगड (chandigarh) आणि राजकोट (rajkot) या शहरांत येणारी व जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सध्या सर्वच यंत्रणा सतर्क आहेत आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.