9.4 C
New York

Operation Sindoor : आंतरराष्ट्रीय देशांच्या नेत्यांनी आणि मीडियाने काय दिल्या प्रतिक्रिया

Published:

‘ऑपरेशन सिंदूर’, ज्याने 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. या ऑपरेशनने जागतिक स्तरावर मोठी खळबळ माजवली आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाने यावर काय लिहिलं आणि विविध देशांच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या, याचा आढावा आपण पुढील काही मिनिटांत घेणार आहोत.

‘ऑपरेशन सिंदूर’ला आंतरराष्ट्रीय मीडियाने मोठ्या प्रमाणात कव्हर केलं, परंतु त्यांच्या दृष्टिकोनात वैविध्य दिसून आलं. पाकिस्तानच्या माध्यमांनी, विशेषतः जियो न्यूज आणि PTV न्यूज यांनी, भारताच्या या कारवाईला ‘कायराना’ आणि ‘आक्रामक’ ठरवलं. PTV न्यूजने दावा केला की, या हल्ल्यात एका मुलासह काही नागरिकांचा मृत्यू झाला आणि काही जखमी झाले. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी याला ‘आधी रात्रीचा शर्मनाक हल्ला’ असं संबोधलं आणि पाकिस्तान योग्य वेळी प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला. ARY न्यूजने याला रिहायशी भागांवर हल्ला असल्याचं सांगितलं, पण काही चॅनेल्सनी हल्ल्यांचं स्वरूप मर्यादित असल्याचंही नमूद केलं.

पाश्चिमात्य माध्यमांनी याला अधिक संतुलित दृष्टिकोनातून पाहिलं. बीबीसीने ऑपरेशन सिंदूरला भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचा भाग म्हणून मांडलं, पण यामुळे भारत-पाकिस्तान संबंध आणखी तणावग्रस्त होऊ शकतात, याकडेही लक्ष वेधलं. अल जझीराने भारताच्या कारवाईला पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून सादर केलं, परंतु यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली. न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या ‘शून्य सहिष्णुता’ धोरणावर भाष्य केलं आणि ऑपरेशनच्या अचूकतेला अधोरेखित केलं, पण नागरी हानीच्या पाकिस्तानी दाव्यांवरही चर्चा केली. दक्षिण आशियाई माध्यमांनी भारताच्या कारवाईचं स्वागत केलं. बांगलादेश आणि श्रीलंकेतील वृत्तपत्रांनी भारताच्या दहशतवादविरोधी कृतीला पाठिंबा दर्शवला, तर चीनच्या ग्लोबल टाइम्सने याला ‘उत्तेजक’ कारवाई ठरवलं आणि भारताला संयम राखण्याचं आवाहन केलं.

ऑपरेशन सिंदूरवर अनेक देशांच्या नेत्यांनी आपापल्या दृष्टिकोनातून प्रतिक्रिया दिल्यात. अमेरिकेचे खासदार थानेदार यांनी सांगितलं की, युद्ध हा कधीच उपाय नाही, पण दहशतवाद्यांना शिक्षा करणं आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना परिणाम भोगावे लागतील, हे दाखवणं महत्त्वाचं आहे. त्यांनी भारत आणि अमेरिकेने दहशतवादविरोधी लढ्यात सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल. हे दोन देश अनेक शतकांपासून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. मला आशा आहे की हे सगळं लवकर संपेल. कोणीही हे पाहू इच्छित नाही की दोन शक्तिशाली देश युद्धाच्या दिशेने जात आहेत. हे दोन राष्ट्रे ऐतिहासिक वैर आणि तणाव घेऊन चाललेली आहेत. मात्र, जगाला आता शांततेची गरज आहे, संघर्षाची नव्हे, अशी प्रकिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. तर अमेरीकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो दोन्ही पक्षांशी संपर्कात असल्याचं नमूद केलं. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाझ शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूरला ‘कायराना’ ठरवलं आणि पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. त्यांनी देशाचं मनोबल उच्च असल्याचंही म्हटलं.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानला सैन्य संयम राखण्याचं आवाहन केलं. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, दोन्ही देशांमधील सैन्य टकराव जगाला परवडणारा नाही. इज्रायलने भारताच्या आत्मरक्षेच्या अधिकाराचं समर्थन केलं, तर यूएईने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आणि तणाव कमी करण्याचं आवाहन केलं. यापूर्वी पहलगाम हल्ल्यावर ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आणि नेदरलँड्सचे प्रधानमंत्री डिक शूफ यांनी भारताला पाठिंबा दर्शवला होता, पण ऑपरेशन सिंदूरवर त्यांच्या ताज्या प्रतिक्रिया उपलब्ध नाहीत.

‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाची ताकद जगाला दाखवली, पण यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर नव्या तणावाची छाया पडली आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाने याला मिश्र स्वरूपात कव्हर केलं, तर जागतिक नेत्यांनी संयम आणि शांततेचं आवाहन केलं. भारताने मात्र आपली कारवाई केवळ दहशतवाद्यांविरुद्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे. येत्या काळात याचे परिणाम काय होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img