15.4 C
New York

Caste census : जातीगत जनगणनेच्या वादात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Caste in India’ पुस्तक दिशादर्शक ठरणार ?

Published:

सध्या भारतात जातीगत जनगणनेच्या (caste census) मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. जे लोक याआधी ‘जातीय जनगणनेमुळे जातीयवाद वाढेल’ असं म्हणत होते, त्यांनीच जातिच्या आधारावर गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘जो करेगा जात की बात, उसको कसके मारुंगा लात’ असं म्हणणारे नितीन गडकरी (Nitin gadkari) आहेत, ‘जिसकी जात का पता नहीं, वो जात की बात कर रहा है’ असं संसदेतच म्हणणारे अनुराग ठाकुर आहेत व थेट सुप्रीम कोर्टात (Supreme court) ‘जातीय जनगणना करणार नाही’ असं लिहून देणारं केंद्र सरकार देखील आहे. अशा वेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb ambedkar) जातीच्या मूळ संकल्पनेवर टाकलेला प्रकाश त्यांच्या पुस्तकातून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं Caste in India: Their Mechanism, Genesis and Development हे पुस्तक 1961 मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या निबंधावर आधारित आहे. आज या पुस्तकाच्या प्रमुख मुद्द्यांचा आणि त्याच्या समीक्षेचा आढावा घेऊया.

Caste in India हे पुस्तक भारतीय समाजातील जातीव्यवस्थेच्या उत्पत्ती, रचनेचा आणि विकासाचा सखोल अभ्यास आहे. डॉ. आंबेडकर यांनी यात जातीचा प्रश्न केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून न पाहता, सामाजिक, ऐतिहासिक आणि मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषित केला आहे. त्यांच्या मते, Caste ही एक अनन्यसाधारण सामाजिक रचना आहे, जी भारतातच आढळते. त्यांनी जातीच्या उत्पत्तीचा मागोवा घेताना ती वर्णव्यवस्थेपासून कशी विकसित झाली, याचा तर्कशुद्ध विचार मांडला आहे. डॉ. आंबेडकर यांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की, caste ही केवळ श्रमविभागणी नाही, तर ती सामाजिक बहिष्कार आणि असमानतेच्या तत्त्वावर आधारित आहे. यात अंतर्विवाह हा जातीचा केंद्रबिंदू आहे. म्हणजेच, जातीच्या आतच विवाह करण्याची सक्ती ही जातीच्या अस्तित्वाचं आणि टिकण्याचं प्रमुख कारण आहे. यामुळे समाज तुकड्यांमध्ये विभागला गेला आणि सामाजिक एकता कमकुवत झाली. परंतु अंतर्जातीय विवाहाने जाती व्यवस्थी नष्ट होईल यावर डॉ.आंबेडकरांचा विश्वास नाही. त्यांना याबाबत त्यांच्या 1935 सालच्या जातीयतेचे उच्चाटन या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे.

Caste in India या पुस्तकाची रचना अत्यंत तर्कशुद्ध आणि संक्षिप्त आहे. डॉ. आंबेडकरांनी चार प्रमुख भागांमध्ये जातीचं विश्लेषण केलं आहे. यामध्ये प्रथम जातीचं यंत्रणाशास्त्र आहे. यात ते जातीच्या रचनेचं तांत्रिक विश्लेषण करतात. अंतर्विवाह, सामाजिक नियम आणि बहिष्कार यामुळे ‘जात’ ही व्यवस्था कशी टिकून आहे, हे ते स्पष्ट करतात. नंतर डॉ. आंबेडकर जातीच्या उत्पत्तीबद्दल बोलतात. त्यांनी जातीच्या उत्पत्तीचा मागोवा घेताना ब्राह्मणवाद आणि धार्मिक ग्रंथांचा प्रभाव तपासला आहे. त्यांच्या मते, जातीचा विकास हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळेही झाला. याबाबतीत त्यांनी नंतर 1935 मध्ये त्यांच्या Annihilation of Caste या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.

जातीचा विकास या तिसऱ्या बिंदूत ते जातीच्या बदलत्या स्वरूपाचा आणि त्याच्या सामाजिक परिणामांचा विचार करतात. नंतर ते जातीच्या परिणामाबद्दल चर्चा करतात. डॉ. आंबेडकर यांनी जातीमुळे समाजात निर्माण झालेल्या असमानता, भेदभाव आणि सामाजिक विघटनावर भाष्य केलं आहे. डॉ. आंबेडकरांचं विश्लेषण वैज्ञानिक आहे. त्यांनी पाश्चात्य मानवशास्त्रज्ञ आणि भारतीय विद्वानांच्या मतांचा संदर्भ घेऊन आपलं मत मांडलं आहे. जाति व्यवस्थेला डॉ.आंबेडकर ‘जिने नसलेली इमारत’ म्हणतात. म्हणजे जो ज्या मजल्यावर जन्म घेणार तो त्याच मजल्यावर आपले आयुष्य जगणार, त्याला वरच्या किंवा खालच्या मजल्यावर जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

Caste in India हे पुस्तक आजही का महत्त्वाचं आहे? त्याचं पहिलं कारण म्हणजे, डॉ. आंबेडकरांनी जातीचा प्रश्न वैश्विक संदर्भात मांडला आहे. त्यांनी जातीला भारतीय समाजाच्या मर्यादित चौकटीत न पाहता, तिचं तुलनात्मक विश्लेषण केलं आहे. दुसरं असं की, त्यांनी जातीच्या समस्येला सामाजिक सुधारणांचा भाग बनवण्याचा आग्रह धरला. आजच्या जातीगत जनगणनेच्या चर्चेतही हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

जातीय जनगणनेचा विरोध करणारे म्हणत होते की, यामुळे जातीयता वाढेल. पण डॉ. आंबेडकर यांचं म्हणणं आहे की, जातीचं वास्तव नाकारणं किंवा ती लपवणं हा उपाय नाही. उलट, जातीच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी तिचं खुलं विश्लेषण आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळे, जातीगत जनगणना ही सामाजिक न्यायाची पहिली पायरी ठरू शकते, असं डॉ. आंबेडकरांचा विचार सांगतो. या पुस्तकाची ताकद म्हणजे त्याची तर्कशुद्धता आणि संक्षिप्तता. डॉ. आंबेडकरांनी कमी शब्दांत खूप मोठा विचार मांडला आहे. त्यांचं लेखन तीक्ष्ण, स्पष्ट आणि प्रभावी आहे. तसंच, त्यांनी जातीच्या प्रश्नाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला, जो त्या काळात क्रांतिकारी होता.

Caste in India हे पुस्तक भारतीय समाजातील जातीच्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला समजून घेण्यासाठी एक मूलभूत दस्तऐवज आहे. आजच्या काळात, जेव्हा जातीगत जनगणनेच्या मुद्द्यावरून देशात चर्चा सुरू आहे, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आपल्याला दिशा देऊ शकतो. जातीला नाकारणं किंवा तिच्यावर पांघरूण घालणं हा उपाय नाही; तिचं वास्तव समजून घेऊन, सामाजिक न्यायाच्या दिशेने पावलं उचलणं गरजेचं आहे. तुम्हा सर्वांना आवाहन आहे की, तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. ते तुम्हाला जातीच्या प्रश्नावर नव्याने विचार करण्यास भाग पाडेल आणि सामाजिक बदलाची प्रेरणा देईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आजही आपल्याला मार्ग दाखवतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img