मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षाचे नेतेमंडळी माध्यमांशी संवाद साधत आहेत. एका पक्षाची भूमिका सकारात्मक आहे तर, दुसऱ्या पक्षाची भूमिका सावध आहे. अशात ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. त्यानुसार, 29 एप्रिलपर्यंत काहीच बोलू नका असे, राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. (raj thackeray on uddhav thackeray do not talk about alliance instructions of raj thackeray to mns leaders)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना दोघांमधील वाद बाजूला ठेवण्याबाबत भाष्य केलं. त्यानंतर मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील वाद बाजूला ठेवायला तयार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. या टाळी-प्रतिटाळीनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे.
Raj Thackeray राज ठाकरेंचा नेमका आदेश काय?
मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांनी आलेला आदेश सांगितला. त्यानुसार, “मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका”, असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु आहे. राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, असं अनेकजण बोलताना दिसत आहेत.
Raj Thackeray ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीबाबत नाराजीनाट्य?
ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्यापासून मनसे नेते संदीप देशपांडे सातत्याने माध्यमांशी संवाद साधत आहेत. एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी घातलेल्या अटीनंतर संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला. त्यानुसार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली. तसेच मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने उद्धव ठाकरे देखील माफी मागणार का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. त्याशिवाय, मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्विटनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यानुसार, “अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत मनसे नाराजीनाट्य सुरू झालं आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.