नागरिकांनो, सावधान! जुन्नर तालुक्यात सध्या दिवसा ढवळ्या घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी,जेव्हा घराला कुलूप लावून तुम्ही शेतात जात असाल,तेव्हा अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.त्याचे कारण असेच आहे की, जुन्नर तालुक्यात दिवसा रेकी करून, दिवसा घरफोडी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
दि.२४ जून रोजी पिंपरीपेंढार ( गटवाडी ) ता.जुन्नर येथील अमित दत्तात्रय कुटे त्यांच्या शेतातील घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे मंगळसूत्र,राणीहार व पेडंन असे साडेसहा तोळे सोने लंपास केले. त्याच दिवशी एक ते दीड तासाच्या अंतरात,पिंपळवंडी कोकाटेमळा येथील बबन गोविंद कोकाटे यांच्या शेतातील राहत्या घराच्या दरवाजाचे अज्ञात चोरट्यांनी कडी, कोयंडे तोडून घरातील साडेआड तोळे सोने आणि अकरा हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे. या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.
बबन कोकाटे हे पत्नीबरोबर पुणे येथे मुलाकडे गेले होते, त्यांची सून विद्या कोकाटे या मंगळवारी दि.२४ रोजी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या.दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोकाटे यांच्या घराची कडी कोयंडा तोडून,दिवसा घरफोडी केली.बबन कोकाटे यांची सून विद्या ह्या सायंकाळी साडेपाच वाजता घरी आल्यानंतर सेफ्टी दरवाजाचा कडी,कोयंडा तोडून,घराचा दरवाजा उघडा दिसल्याने,त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, कपाटाचे लॉकर तोडून कपाटा मधील सोन्याचे मंगळसूत्र,कानातील कुड्या,वेल,अंगठ्या व चेन असे एकूण साडेआड तोळे सोने आणि अकरा हजार रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लंपास केले असल्याचे दिसले.तसेच कपाटातील साहित्य घरातच इतरत्र अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. चोरीच्या घटनेबाबत कोकाटे कुटुंबीयांनी आळेफाटा पोलीसांत तक्रार दिली आहे.
यावर्षी वेळेआधी पाऊस सुरू झाला व मे महिन्यातच धो-धो समाधानकारक पाऊस पडला,पावसाने थोडीशी विश्रांती दिल्याने,सर्वच शेतकरी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये जिकडे तिकडे व्यस्त आहेत.याचाच फायदा उचलत चोरट्यांनी दिवसा रेकी करून,दिवसा घरपोडी करण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असून,एक तोळा सोन्याची किंमत एक लाखाजवळ गेली आहे.परप्रांतीय तरूण ग्रह उपयोगी वस्तूंची विक्री करण्यासाठी फेरीचा व्यवसाय करत असून,या व्यवसायानिमित्ताने शेतात घरोघरी फिरत आहेत तसेच भंगार गोळा करणारे परप्रांतीय देखील शेतात शेतकऱ्यांकडे खरेदी-विक्रीच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत थेट पोहोचत आहेत. या तरूणांना ना कोणी ओळखपत्र विचारले असेल ? ना कोणी त्यांची चौकशी केली असेल! याचाच फायदा घेत दिवसा रेकी करून चोरीच्या घटना घडततर नाहीत ना ? असाही सवाल जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.
जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र असून, रात्रीच्या वेळी सर्वत्र बिबट्याचा मुक्त संचार असल्याने,रात्री बिबट्याच्या भीतीने चोरट्यांनी दिवसा घरफोडी करण्यासाठी आपला मोर्चा शेतातील वाड्या वस्त्यांकडे वळविला आहे का ? असाही सवाल उपस्थित होत आहे.