राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या राजकारणात एक नवा मोड यायला सुरुवात झाली असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध सुधारण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे राजकीय ‘टायमिंग’ अचूक साधल्याचे जाणवत आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हालचाली जोरात सुरु आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सत्ता उपभोगतोय, तर शरद पवार यांच्या गटात मात्र अस्वस्थता वाढली आहे. विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांची बेचैनी आता स्पष्ट होऊ लागली आहे. मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत सहभाग नाही आणि स्थानिक प्रश्न मार्गी लागत नाहीत – अशा अनेक तक्रारी त्यांनी शरद पवारांच्या कानावर घातल्याचे समजते.
“सत्तेपासून दूर राहून आम्हाला काम करणे कठीण होते आहे,” असे म्हणत त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा आग्रहही धरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र शरद पवारांनी मात्र आपल्या स्पष्ट भूमिकेत भाजपसोबत जाण्यास पूर्ण नकार दिला आहे. “भाजपसोबत युती नको,” हे त्यांचे मत अजूनही ठाम आहे. त्यामुळे त्यांच्या गटातील आमदार आता संभ्रमात पडले आहेत.
तसे पाहिले तर खासदार पातळीवर शरद पवारांना पाठिंबा आहे, आणि त्यांनी त्यांच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. पण आमदारांचा दबाव वाढत चालल्याने पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.